पुणे – आयुष्यभर धावपळ करून संसाराच्या सुरुवातीला साथीदाराबरोबर न मिळालेले क्षण आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा जगता यावेत, यासाठी उतारवयात प्रत्येक जण धडपड करतो. प्रेमात आकंठ बुडालेले पती-पत्नी सेकंड इनिंगच्या टप्प्यातही थरथरलेल्या हातांना हात अन् एकमेकांना साथ देत त्याच उत्साहाने संसार फुलवितात. मात्र, सध्या बदलत्या काळानुसार आता उतार वयातही पती-पत्नींला या नात्याचे ओझे सहन होताना दिसत नाही म्हणून ते उतरवण्याची धडपड ज्येष्ठांकडून सुरू असल्याचे कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांवरून दिसून येते.
वृद्धापकाळात दोन गोष्टीं हाताशी असतात. एक म्हणजे निवृत्तीनंतर मिळालेलां वेळ आणि दुसरी कमतरता ती म्हणजे जवळच्या माणसांचा सहवास. जिथे विचार जुळतात तिथे संसार फुलतो. मात्र, ज्या ठिकाणी विचार पटू लागत नाही त्याठिकाणी पती-पत्नीमध्ये खटके उडू लागतात. तारुण्यात साथीदाराचा स्वभाव सहन होत नसला तरी समाज, सासू-सासरे, आई- वडील व मुख्य म्हणजे मुलांसाठी सहन केला जातो. वृद्धापकाळात साथीदाराचा स्वभाव सहन करण्याची सहनशीलता संपलेली असते.
मात्र, घरातील वडीलधार्या मंडळींचा आधार गमावल्यावर व मुले मोठी होऊन स्वतंत्र झाल्यावर साथीदाराबरोबर राहण्यासारखे कारण उरत नाही आणि आयुष्यभर जे सोसले ते आता का सोसावे? उरलेले आयुष्य मनासारखे जगता यावे, यासाठी घटस्फोटासारखा मार्ग काही वृद्ध जोडपी निवडत आहे.
पालकांच्या निर्णयाला मुलांचाही पाठिंबा
शारीरीक अथवा मानसिक छळ, वाद, एका साथीदाराने दुसर्या साथीदाराला केलेली मारहाण, शिवीगाळ लहानपणापासून पाहिल्याने आर्थिकरीत्या स्वतंत्र झालेली मुलेच कधीकधी पालकांना वेगळे होण्याचा सल्ला देतात. याखेरीज, आई व वडिलांनी विभक्त होण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देतात, असे निरीक्षण वकील वर्गाकडून नोंदविण्यात आले.
माधव हा पोलीस खात्यात तर वैभवी ही शिक्षिका म्हणून नोकरी करीत होती. सध्या माधव हा ६५ वर्षांचा असून वैभवी ६३ वर्षांची आहे. त्या दोघांनाही एक मुलगी आहे. लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांनाही कामानिमित्त एकत्र राहता आले नाही. निवृत्तीनंतरही दोघांना एकमेकांची सवय नसल्याने त्यांना एकमेकांच्या गोष्टी खटकू लागल्या. एकुलत्या एक मुलीच्या लग्नानंतर त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने तो मंजूर केला.
“पूर्वी घरातील ज्येष्ठ लोक कुटुंब व्यवस्था टिकवायचे. भांडण झाल्यानंतर मुला-मुलींना समजावायचे. मात्र, ते आता स्वतःचे विचार, स्वातंत्र्य या मुद्द्याकडे वळताना दिसतात. एकमेकांचा आधार घेताना एकमेकांसोबत जगताना, एकमेकांशिवाय आयुष्य अपूर्ण वाटणारी पिढी आता लोप पावत चालली आहे. तरूणाईसह ज्येष्ठांमध्येही घटस्फोटाचे वाढत जाणारे प्रमाण ही कुटुंबव्यवस्थेसाठी चिंताजनक गोष्ट आहे.” – अॅड. निनाद बागमार