अंकुश भूमकर
लोणी धामणी -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगावपीर, पहाडदारा, खडकवाडी, मांदळेवाडी परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतात असलेली पिके कांदा, बटाटा, कडवळ व इतर तरकारी पिके जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे; मात्र या परिसरात शासनाने अजूनही कृषी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
या परिसरात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. पाऊस पडला पण इतका की अतिवृष्टीमुळे पावसाने शेतातील कांदा, बटाटा, ज्वारी व इतर तरकारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. लाखो रुपयांचे भांडवल पाण्यात गेले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. दिवाळीचा सण पंधरा ते वीस दिवसांवर येऊन ठेपला आहे;
मात्र अतिवृष्टीमुळे सर्वच पीके पाण्यात सडून गेली आहेत. अशा परिस्थितीत बळीराजाचे अर्थकारण कोलमडून गेले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी वडगावपीरच्या सरपंच मीरा संजय पोखरकर, पहाडदराच्या सरपंच राजश्री कुरकुटे, रानमळ्याचे उपसरपंच राजेंद्र सिनलकर, वाळुंजनगरचे माजी उपररपंच महेंद्र वाळुंज यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
कर्ज काढून साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने बटाट्याचे बियाणे खरेदी केले होते; मात्र सर्वच्या सर्व बटाटे अतिवृष्टीमुळे सडून गेले आहेत. अजूनही शेतात पाणी आहे, लाखो रुपये भांडवल गुंतवणूक वाया गेले आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
– मच्छिंद्र अमाप, शेतकरी धामणी, ता. आंबेगाव
आंबेगाव पूर्व भागात मागील काही वर्षाच्या तुलनेत ह्यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील पेठ -घोडेगाव व कळंब -रांजणी जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अजूनही पूर्वभागातील पारगाव -अवसरी गटात पंचनामे सुरू झाले नाहीत. शासनाने उशीर न लावता तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावी
– रवींद्र करंजखेले, पंचायत समिती सदस्य आंबेगाव
पूर्व भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते; मात्र या परिसरात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथील शेतकरी तरकारी पिकांना प्राधान्य देत आहे. ह्या वर्षी उभी पिके पाण्यात सडून गेल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी
– रामदास जाधव, सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस आंबेगाव