2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रस्थानी : शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार?
प्रमोद ठोंबरे
बारामती – बारामती ही नेहमीच राज्य व देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. सत्तेच्या सारीपाटावर असो किंवा परीघाबाहेर असले तरी बारामती शहर हे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा मोदी सरकारविरोधात बारामती देशाच्या केंद्रस्थानी आली आहे. रविवार (दि.20) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी स्वतः याची माहिती दिली. त्यामुळे बारामती शहर हे राजकीय पातळीवर देशात पुन्हा चर्चेत आले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचा फिरता लंबक हा नेहमीच बारामतीच्या बाजूकडे सरकत असतो. शरद पवार यांच्याभोवती राजकारण फिरत राहत आहे. गेल्या 50 वर्षांत हा अनुभव राजकर्त्यांनी घेतला आहे. शेतकरी चळवळीतील शेतकरी संघटनेचे आंदोलन, गोविंदबागेतील राजकीय नेत्यांची भेट, राजकीय घडामोडी बारामतीत घडत असतात. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीमधील हालचालीकडे वेधले जाते. यापूर्वी शिक्षकांच्या आंदोलनाने लक्ष वेधले आहे.
देशभरातील भाजपशासित राज्ये वगळून इतर राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अन्य राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचे एकत्र संमेलन बारामतीत भरवले जाणार असल्याची माहिती तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे 2024 मधील राजकीय केंद्रबिंदू शरद पवार यांच्याकडे सरकला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुंबई दौरा करून देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. ज्यावेळी देशांमध्ये पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत, दुसऱ्या टप्प्यांतील मतदान होत असतानाच राव यांनी राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राजकारणात नव्याने एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.येत्या काळात बारामतीत देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे बडे नेते येणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गोविंदबागही चर्चेत
शरद पवार यांचा बारामती दौरा असला की राज्याचे लक्ष गोविंदबागेकडे जाते. या गोविंदबागेत राजकीय नेत्यांची हजेरी, सत्तेच्या सारीपाटावरील बेरजेचे राजकारण, आदी घडामोडीमुळे गोविंदबाग चर्चेत असते. सध्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा झाल्यानंतर राजकीय नेत्यांची हजेरी गोविंदबागेत लागणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.