मंत्रिमंडळात मोहिते पाटलांना पुन्हा डावलले
रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर : महाराष्ट्रात रविवारी (दि. 2 जुलै) मोठा राजकीय भूकंप झाला. त्याची कंपने जिल्ह्यातही जाणवू लागली आहेत. या राजकीय भुकंपानंतर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली; मात्र वर्षानुवर्षे त्याच त्याच चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देत म्हणत खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार, अजित पवार यांच्या टीकास्त्र सोडले. दरम्यान, नऊ नेत्यांमध्ये आमदार मोहितेंना स्थान न मिळल्याने खेडला मंत्रीपद मिळण्याच्या आशा आता धूसर झाली आहे. परिणामी खेड तालुक्याचा मंत्रिपदाचा “बॅकलॉग’ कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मर्यादित राज्य मंत्रिमंडळ विस्तारातील पदसंख्या आणि त्यासाठी असलेली दावेदारांची मोठी रांग होती. यामुळे यापूर्वीही खेड तालुक्यातील मंत्रिपदाची वाट बिकटच होती. त्यात दोन भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या सत्तेत आता राष्ट्रवादी कॉंग्रेस तिसरा वाटेकरी आला आहे. सरकारमध्ये सहभागी होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला 33 टक्के मंत्रिमंडळातील वाटा एका झटक्यात घेतला. यात मोहिते पाटील यांना स्थान मिळाल्याने त्यांच्यासह खेड तालुक्यात नाराजी पसरली आहे.
आमदार मोहिते म्हणाले की, आम्ही अजित पवार यांना स्पष्टच सांगितले की, आमच्या राजकीय जीवनात सर्वात जास्त त्रास दिलीप वळसे पाटील यांच्याकडून झाला आहे. यामुळे त्यांच्या मंत्रिपदाला विरोध आहे. नको असलेले लोक पुन्हा एकदा आमच्या बोकांडी बसविले. त्यामुळे त्यांना पाठिंबा नसणार असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, 2009 ते 2014 आणि 2019 ते जून 2022 वर्षभरापासून खेड तालुक्यला मंत्रिपदाची संधीच मिळालेली नाही. त्यातच आता पुन्हा अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेची वाटेकरी झाली असली तरी खेड तालुक्याला पुन्हा मंत्रिपदाला हुलकावणी मिळाली हे मात्र नक्की!
मोहिते पाटील तटस्थ
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी झाली. त्यानंतर शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या लोकांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजित पवार यांच्यासोबत नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला.त्यात दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे;परंतु आता दिलीप वळसे पाटील यांच्या मंत्रिपदाला अजित पवार समर्थक आमदारांकडून विरोध होत आहे. दिलीप वळसे यांचा मंत्रिपदी समावेश केल्यामुळे आपण तटस्थ असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.
दिलीप वळसेंवर सोडले टीकास्त्र
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राज्याचे मंत्री म्हणून कधीही वावरले नाही. ते फक्त तालुक्याचे मंत्री म्हणून राहिले. त्याचा तोटा हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला झाला अन् मलाही झाला. पुन्हा ती वेळ येणार असेल तर मी माझा निर्णय घेणार आहे. तालुक्यातील जनता आणि कार्यकर्ते सांगतील तिकडे जाणार असल्याची भूमिका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे.