पुरंदर तालुक्यातील उत्पादक हतबल : उभ्या पिकात पोकळी
वजन 50 टक्के घटण्याची भीती
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील शेतकरीवर्ग आगोदरच दुष्काळसदृश परिस्थितीने हतबल आहेत. शेतातील उभी पिके पाण्यावाचून करपून जाऊ लागली असतानाच आता ऊस उत्पादन बळीराजा पुढे, दुसरे संकट निर्माण होऊ लागले आहे. शेतातील उभ्या उसाला येत असलेल्या मोठ्या प्रमाणात तुरे यामुळे शेतकरीवर्ग हतबल होत आहे. मागील महिन्यांपासून वातावरणात होत असलेले बदल यामुळे ऊस पिकांसह सर्वच पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. यामुळे शेतकरीवर्गाला दिवसेंदिवस मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
वाल्हे परिसरामधील अनेक ठिकाणच्या उसाच्या क्षेत्राला तुरे उगवल्याने या तुर्याने उभ्या उसात पोकळी निर्माण केलीय आहे. परिणामी उसाचे वजन 50 टक्के घटले जाते, असे शेतकरी वर्गाचे मत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचे याला कारण असले तरी, ऊस तोडणी मात्र लांबली आहे. उसाच्या लागवडीनंतर त्याची तोडणी साधारण 15 ते 16 महिन्यांनी अपेक्षित असते. पण साखर कारखानदारांकडून यावर्षी ही तोडणी दोन ते तीन महिने लांबणीवर गेली आहे. त्यामुळे उसावर तुरे उगवून, ते उभ्या उसाला पोकळी तयार झाली असून, परिणामी ऊसाच्या वजनात किमान पन्नास टक्क्यांनी घट होईल; तर, साखरेची मात्र शंभर टक्के निर्मिती होते. असे मत ऊस उत्पादक शेतकरीवर्गाचे आहे.
वाल्यातील बळीराजा कचाट्यात
वाल्हे परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. उसाचे पीक तोडणी योग्य होऊन बराच काळ गेला आहे. तरीदेखील कारखान्यांकडून ऊस तोडणी मजुरांची वाट परिसरातील शेतकरी पाहात आहेत. शेतकर्यांचा ऊस तोडणी दिवसेंदिवस पुढे जात आहे. यामुळे वाल्हे परिसरातील शेतकरी मोठ्या कचाट्यात सापडला आहे. ठिकठिकाणी ऊसाने तुरे टाकले आहेत.
बळीराजाच्या मनातील प्रश्न
तुरे टाकल्याने उसाच्या रसात घट होणार. उसाला आलेल्या तुरे यामुळे वजनात मोठी घट मात्र यात कारखान्याचा जास्त फायदेशीर होतो. अशा एकअनेक प्रश्नांनी शेतकर्यांच्या मनी अनेक शंका-कुशंका आहेत.
शेतकरी दुहेरी संकटात
शेतकर्यांवर एकीकडे पाणीटंचाईचे संकट तर, दुसरीकडे शेतातील तोडणीला आलेला ऊस कारखाना तोडून घेत जात नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे. मागील तीन-चार वर्षांपासून पुरंदरमध्ये पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे उसाची लागवड वाढली होती. मात्र, यावर्षी पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व व मान्सून तसेच परतीचा पाऊस पडला नसल्याने यावर्षी तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यातच शेतातील उभी पिके पाण्यावाचून करपून जाऊ लागली आहेत.
हातातोंडाशी आलेले घास जतो की काय?
शेतकरीवर्गाचे भरोशाचा उत्पन्नाचा स्त्रोत असलेले उसाचे पीक ही पाणीटंचाईमुळे करपू लागले असल्याने हातातोडांशी आलेला घास, हातातून जातोय की काय, अशी भीती ऊस उत्पादन शेतकरीवर्गाला वाटत आहे. तसेच परिसरातील शेतकर्यांच्या ऊसाला तुरा निघाला आहे. त्यामुळे ऊसाच्या वजनात घट होते व उत्पन्न कमी होणार असून, त्यामुळे शेतकरी वर्गावर आता आर्थिक संकट घोंगावत असल्याने, शेतकरीवर्गात चिंता निर्माण झाली आहे.