पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने बुधवारी (तीन जानेवारी) पहिल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या या संमेलन स्थळाचे नामकरण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्यनगरी असे करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, सार्वजनिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपस्थित राहणार आहेत.
या एकदिवसीय संमेलनाच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, कला आणि विचारांचा जागर करण्यात येणार आहे, अशी माहिती संमेलनाचे समन्वयक डॉ. माणिकराव सोनवणे, दीपक चांदणे, पुरूषोत्तम सदाफुले आणि कवी राजेंद्र वाघ यांनी दिली.
समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून बार्टीचे महासंचालक सुनील वारे निमंत्रक आहेत. संमेलनानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते, तर चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे.