स्वागताला वरूणराजाची हजेरी : मानकऱ्यांच्या सत्कारानंतर सोहळ्याची सांगता
रामकुमार आगरवाल
देहूगाव – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी 337 व्या पालखी सोहळ्याचे 35 दिवसांच्या प्रवासानंतर रविवारी (दि.24) दुपारी पावणे तीनच्या सुमारास तीर्थक्षेत्र देहूत आगमन झाले. देहूकर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे भक्तीमय आणि आनंदमय वातावरणात मोठ्या उत्साहाने स्वागत केले. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्यातील सहभागी विणेकरी, मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी यांना श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. भाविकांचेही आभार मानण्यात आल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली.
पहाटे नित्यपूजेनंतररविवारी (दि.24) पिंपरीगावातील श्री भैरवनाथ मंदीर येथून पालखी सोहळा वारकरी दिंडीकरी आणि भाविकांसह पुणे-मुंबई महामार्गावरून देहूगावाकडे मार्गस्थ झाली. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड लष्कर भागातून देहूरोड पालखी मार्गाने चिंचोली येथील शनी मंदिराजवळ आल्यानंतर अभंग आरती झाली. दरम्यान दुपारी चिंचोली येथील शनिमंदीर येथे संत तुकाराम अन्नदान मंडाळाच्या वतीने एकादशीनिमित्त वारकऱ्यांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
देहूतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे दुपारी पावणेतीनच्या सुमारास आगमन झाले. पालखीच्या स्वागताला वरूण राजानेदेखील हजेरी लावली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून पालखीचे मोठया उत्साहाने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी सुवासिनींनी वारी पूर्ण केलेल्या वारकऱ्यासंह पालखी रथाच्या बैलजोडीलाही औक्षण केले.
दरम्यान, सविता तुपे, रामचंद्र तुपे कुटुंबियांकडून वेशीजवळ पालखीला दही भाताचे नैवद्य दाखविण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख हभप संतोष महाराज मोरे, हभप विशाल महाराज मोरे, हभप माणिक महाराज मोरे, विश्वस्त हभप संजय महाराज मोरे, हभप भानुदास महाराज मोरे, हभप अजित महाराज मोरे, संस्थानचे माजी अध्यक्ष, विश्वस्त, महाराजांचे वंशज व भाविक उपस्थित होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पालखी रथ आल्यानंतर रथातून पालखी खांदेकऱ्यांनी खांद्यावर घेतली. पालखीतील पादुकांच्या दर्शनासाठी ग्रामस्थ, भाविकानी गर्दी केली होती. चौकाजवळील हनुमान मंदीरासमोर संतपर अभंग झाले. पालखीचे महाराजांच्या जन्मस्थळासमोर आरती झाली. पालखी सोहळा मुख्य मंदिरात आल्यावर पालखी खांद्यावर घेऊन देऊळवाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली. पालखी भजनी मंडपात आल्यावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात आरती आरतीनंतर उपस्थित वारकऱ्यांनी “पुंडलिका वरदे’ चा जयघोष केला.
भजनी मंडपात सेवेकरी, मानकऱ्यांसह सर्व दिंडीचालकांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर एकादशीचा फराळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
परतीच्या प्रवासात वारकऱ्यांची मोठी गर्दी
गत दोन वर्षात भाविक – वारकऱ्यांना करोनामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होता आले नाही. यंदा या सोहळ्याकरिता सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने पालखीसोबत जाताना वारकऱ्यांची संख्या जास्त होती; तर यंदा पालखी परत येतानादेखील नेहमीपेक्षा भाविक व वारकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.