राजगुरूनगरातील नवीन पाणीपुरवठा योजनेला पुन्हा खोडा
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – शहराला नव्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या चास कमान धरणाजवळ असलेल्या ट्रान्स्फॉर्मरची (रोहित्र)पुन्हा एकदा चोरी झाल्याची घटना सोमवारी (दि.9) सकाळी उघड झाली. रोहित्राची चोरी राजकीय आकसातून झाल्याची मोठी चर्चा आहे.
राजगुरूनगर शहराला चास कमान धरणातून 18 कोटी रुपये खर्चून पाणी योजना मंजूर झाली असून या योजनेचे काम पूर्णत्वाकडे आहे. चास कमान धरणातून पाणी उचलून ते वेताळे गावाच्या टेकडीवरील जलशुद्दीकरण केंद्रात नेण्यात आले आहे. त्यासाठी धरणाजवळ 315 केव्हीचे रोहित्र बसवला आहे. या योजेनचे पाणी राजगुरूनगर शहरातील टक्क्यांपर्यंत पोहोचते की नाही याची फेरचाचणी सुरू होती. शहरातील दोन नव्या टाक्या रविवारी (दि. 8) पूर्ण क्षमतेने भरल्या होत्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी रोहित्र चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा आणि क्वाईल चोरून नेली आहे. त्यामुळे पुन्हा ही योजना काही दिवसासाठी अडचणीत आली आहे.
चास कमान धरण ते राजगुरूनगर अशी पाण्याची लाईन दि. 17 मार्च रोजी पूर्ण झाल्यानंतर पाण्याची चाचणी घेण्यात आली होती. शहरात पाणी आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी धरणाजवळील नव्याने उभारलेला रोहित्राची चोरट्यांनी तोडफोड केली होती. त्यामुळे पुन्हा तो दुरुस्तीसाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले होते. दरम्यानच्या काळात तो दुरुस्त केल्यानंतर नगर परिषदेने येथे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती; मात्र काही दिवसांपूर्वी येथे काम करणारे कर्मचारी नगर परिषदेने काढून घेतल्याने आता पुन्हा चोरीची घटना घडली आहे.
रोहित्राची चोरी होऊनही रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात रोहित्राच्या चोरीची फिर्याद दिलेली नसून ठेकेदार याबाबत फिर्याद देतील.
– प्रकश पाटील, मुख्याधिकारी, राजगुरूनगर नगर परिषद