तालुक्यात गुन्हेगारी फोफावली ः विरोधी पक्षांकडून कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप “टार्गेट’
सासवड – सध्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी व सासवड या दोन्ही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्ह्यांमध्ये एका व्यक्तींचा हस्तक्षेप होत असल्याच्या कारणावरून त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित असलेले दुहेरी हत्याकांडाचे प्रकरण नुकतेच उघड झाले. याप्रकरणात देखील राजकीय हस्तक्षेपामुळे दडपण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा तालुक्यांमध्ये होती. यातच शिवसेना-भाजपा यांनी पत्रकार परिषदा घेत कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता व पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या हत्याकांडाच्या घटनेमुळे पुरंदर तालुक्यातील पोलीस ठाण्याला राजकारणाचे ग्रहण लागले आहे.
तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकीय झालर मिळत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहेत. खून, दरोडे, विनयभंग, पोस्को, सावकारकी या गुन्ह्याची संख्या दिवसनदिवस वाढत आहे. कितेक गुन्ह्याचा तपास अजून बाकी आहे. यातच आणखीन भर म्हणून दुहेरी हत्याकांड प्रकरण वाढले याच्या तपासाबाबत अनेक घडामोडी घडत असून राजकीय पक्षांनी मात्र या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत या हत्याकांडातील मृतदेह पोलिसांनी 24 तासांच्या आतच जाळून टाकला असल्याने तपासावर संशय व्यक्त केला जात आहे.
पुरंदरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्ता गृहमंत्री म्हणून वावरत असल्याचा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. पुरंदरचे कॉंग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर शिवसेनेनंतर भाजपाचे पुरंदर तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. सासवड आणि जेजुरी पोलीस ठाण्याच्या कारभारात आमदार आणि त्यांचा एक सहकारी प्रचंड ढवळाढवळ करत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.
पोलीस आमदारांचेच ऐकतात
पुरंदर तालुक्यामध्ये पोलीस हे आमदाराचेच ऐकतात. ते सांगतील तेच गुन्हे दाखल केले जातात. ज्यांच्यावर खरोखर अन्याय झाला आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मागील साधारण दीड वर्षांपासून ही स्थिती असल्याचा आरोप भाजपसह शिवसेनेने केला आहे.
शिवसेनासह भाजपने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. संबंधितांचे सर्व कॉल डिटेल्स तपासून सत्य जनतेसमोर येऊ द्या. या घटनेशी माझा व माझ्या कोणत्याही कार्यकत्यांचा कसलाही संबंध नाही. कॉल डिटेल्स तपासून सत्य जनतेसमोर येईल.
– संजय जगताप, आमदार पुरंदर-हवेली
कॉंग्रेसचे आमदार स्वत:ला गृहमंत्री समजतात, खंडणीखोर, भंगार गृहमंत्री अशांना पोलीस स्टेशनला बसू देऊ नये, गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आल्यास गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. एक दीड वर्षात जेवढे गुन्हे घडले आहेत.
– गंगाराम जगदाळे, अध्यक्ष, भाजप, पुरंदर तालुका