पुणे : काम सुरू असलेल्या रस्त्यांवर मेट्रोचे साहित्य पडून आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दुभाजकांमध्ये जागा सोडलेली नाही. त्यामुळे मेट्रोच्या मार्गांतील रस्त्यांवर पाणी साचल्यास, अथवा अपघात झाल्यास महामेट्रो प्रशासनावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रशासनास दिले आहेत. यावरून दोन्ही प्रशासनांत समन्वयाऐवजी “महा’संघर्ष निर्माण झाल्याची परिस्थिती आहे.
महापालिका आयुक्तांनी मंगळवारी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. या वेळी मेट्रोकडून निर्माण झालेल्या अडथळ्यांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय, याबाबत मेट्रोला सूचना देण्याचे आदेश दिले. दरम्यान, या बैठकीत आयुक्तांनी नालेसफाई, रस्ते खोदाई तसेच इतर पावसाळी कामांचाही आढावा घेतला. मेट्रो प्रशासनाने ज्या प्रमुख रस्त्यांवर काम केले आहे, तेथील दुभाजक बंद केले आहेत. त्यामुळे अनेक भागांत पावसाळी दुसऱ्या बाजूस वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे, असे पथ विभागाने निदर्शनास आणून दिले. शिवाय पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील स्थानकांचे काम होऊनही बांधकाम तसेच इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता अडवला गेला असून, अपघातांचा धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
पाण्याच्या निचरा होण्यासाठी रस्ता नसल्यास रस्त्यावर पाण्याची तळी साचतील तसेच अपघातही होतील. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा ठरणारे दुभाजक मेट्रो प्रशासनाने तातडीनं काढावेत. स्थानकांखालील बाजूस रस्ता अडवून ठेवलेले साहित्य काढण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर पत्र द्यावे. उपाय योजना न केल्याने पाणी अडल्यास अथवा अपघात झाल्यास त्याला महामेट्रो जबाबदार असेल, असे बैठकीत सांगण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करा
महापालिकेकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दि. 10 जूनपर्यंत आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात येणार आहे. हे कक्ष 24 तास सुरू असतील. या कक्षाचे नियोजन पुढील तातडीने पूर्ण करावे. 10 जूननंतर आपण अचानक या कक्षांची पाहणी करणार आहोत, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.