अभद्र आघाडी आणि युती कार्यकर्त्यांच्या पचनी पडेना
जुन्नर तालुक्यात श्रेय वादासाठी घटक पक्षात वादविवाद
नारायणगाव – जुन्नर तालुक्यात महायुतीच्या सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीनंतर निर्माण झालेली अभद्र आघाडी आणि युती सरकार बघितल्यानंतर सर्वसामान्य जनतेचा राजकारणावरील विश्वास कमी होऊ लागला की काय असे वाटू लागले आहे. राज्याच्या राजकारणात सत्तेच्या हव्यासापोटी झालेले राजकीय बदल अजूनही स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेले नाही.
राज्यात महाविकास आघाडीस्नंतर शिवसेना (शिंदे गट) व भाजपाचे युती सरकार स्थापन झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गट युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्याचे वादग्रस्त पडसाद स्थानिक पातळीवरील भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी पक्षात दिसू लागले आहेत.
तालुक्यात लोकोपयोगी विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रतिनिधी नात्याने आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते होत असताना श्रेयवादासाठी महायुतीतील इतर घटक पक्षांबरोबर वादविवाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये अष्टविनायक रस्त्यावरील कोल्हे मळा परिसरातील बाधित शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला असो अथवा बेल्हे येथील विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी.
जुन्नर तालुक्यातील राजकारण सध्यातरी भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी पक्षाच्या त्रिमूर्ती नेत्यांभोवती फिरत आहे. ज्यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष सत्तेत होते त्यावेळी तळागाळातला शिवसैनिक राष्ट्रवादीबरोबर जुळवून घ्यायला तयार नव्हता. आता महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजपा, शिवसेना (शिंदे गट) गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्याचे राष्ट्रवादी बरोबर सूर जुळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
हे नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे
निवडणुकांचा काळ जसा जसा जवळ येईल तसा महायुतीतील नेते श्रेय वादासाठी तालुक्यातील लोकोपयोगी विकासकामांसाठी आपणच निधी आणला असल्याचा दावा ठोकणार यात शंका नाही. परंतु सुज्ञ मतदारराजा उघड्या डोळ्यांनी सगळं बघत असून भविष्यात न्यायनिवाडा केल्याशिवाय राहणार नाही हे नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. श्रेय वादासाठी जनतेसमोर वादविवाद केला म्हणजे नेत्यांची भूमिका जनतेला पटेलच असे नाही. उलट नेत्यांनी केलेले काम शांततेने व संयमाने चर्चा करून जनतेला सांगितले तर नेतृत्वावरील विश्वास वाढत जाईल.
कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमच
भविष्यात महायुती म्हणून सत्तेतील पक्षनेतृत्वाने निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला तर जुन्नर तालुक्यातील चित्र काय असेल याबद्दल तीनही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे नेते व कार्यकर्ते गोंधळलेल्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सरकार महायुतीचे असले तरी जुन्नर तालुक्यातील महायुती सरकारमधील घटक पक्षाचे नेते वरिष्ठांचे आदेश पाळणार की ऐन निवडणुकीच्या तोंडावर वेगळी चूल मांडणार अथवा पक्षांतर करणार हे बघावे लागेल.