– माधव विद्वांस
कोल्हापूर हे सर्व कलांचे माहेरघर समजले जाते. या कोल्हापूर नगरीतील कलातपस्वी गणपतराव रामचंद्र वडणगेकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1912 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या आई कमळाबाईंनी कष्ट करून मुलांचे संगोपन केले. कुंभार समाजात उपजतच चित्र व शिल्पकला येतेच. त्यामुळे त्यांना चित्रकलेची खूप आवड होती.
जेमतेम सातवीपर्यंत त्यांना शिक्षण घेता आले. पण या काळातच कोल्हापुरातील प्रसिद्ध चित्रकार व कलाशिक्षक बाबा गजबर यांनी त्यांना चित्रकलेचे धडे दिले. त्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे वडणगेकर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षा पास झाले. यापुढील कलाविषयक शिक्षण फक्त मुंबई येथेच उपलब्ध होते. त्यांना ते परवडणारे नव्हते. त्यांनी आपल्या कलेचा सराव आपला आपणच सुरू ठेवला आणि त्यातून वडणगेकरांनी स्वत:ची चित्रशैली निर्माण केली. राजा रविवर्मा आणि बाबुराव पेंटर यांच्या शैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे जलरंगामध्ये पौराणिक देवतांची मोहक चित्रे काढली. कोल्हापूर परिसर निसर्गरम्य असल्याने प्रत्यक्ष तेथे जाऊन निसर्गचित्रे काढली. एखाद्या व्यक्तीला समोर बसवून चित्रे काढण्याचा सराव सुरू केला.
एकदा त्यांनी कोल्हापुरातील कृष्णसरस्वती दत्त महाराज यांचे मोठे चित्र रेखाटले, ते पाहून त्यांच्याकडे व्यक्तिचित्र (पोट्रेट) काढण्याची कामे मिळू लागली. कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजाराम महाराज यांनीही त्यांच्याकडून स्वत:चे तसेच आईसाहेब, अक्कासाहेब, शालिनीराजे या राजघराण्यातील व्यक्तींची समोर बसवून व्यक्तिचित्रे रंगवून घेतली. त्याबरोबरच कृष्णधवल छायाचित्रे तैलरंग भरून आकर्षक करू लागले. वडणगेकरांना छायाचित्र मोठे करणे तसेच त्याचे रंगीत नूतनीकरणाचे काम मिळू लागलं. त्याचवेळी आजूबाजूची चित्रकला शिकणारी मुलेपण चित्रकलेच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागली. त्यामुळे ते गुरुजी म्हणून ओळखले जाऊ लागले.
वडणगेकरांची कलात्मकता पाहून बाबुराव पेंटर यांनी त्यांना त्यांच्या शालिनी सिनेटोन कंपनीच्या नियोजित चित्रपटाच्या सेटिंगची चित्रे काढण्याचे व कलादिग्दर्शनाचे काम सोपविले. त्यानंतर वडणगेकरांनी भालजी पेंढारकरांचे “राजा शिवछत्रपती’ आणि “मोहित्यांची मंजुळा’ या गाजलेल्या चित्रपटांतील ऐतिहासिक चित्रेही रेखाटली. त्यातील आग्य्राच्या दरबाराचे दृश्य फारच सुंदर होते. तसेच भालजींच्या “गनिमी कावा’ या चित्रपटासाठी त्यांनी कमी खर्चात आकर्षक कल्पकतेने सेट उभारून दिले. त्यांच्या चित्रामधध्ये ते सौम्य रंगाचा वापर करीत. त्यामुळे भडकपणा अजिबात नसे. देवतांच्या चित्रांमध्ये सात्विक भाव दिसून येत असे. त्यांच्या निसर्गचित्रामध्ये आकाश, झाडे, पाणी तसेच डोंगर व त्यांवरील दगडगोटे, झुडपे यांचा सुरेख अंतर्भाव असायचा, त्यामुळे देखावा जिवंत वाटायचा.
व्यवसाय चालू असताना समाजाकडेही त्यांचे लक्ष होते. त्यासाठी कुंभार समाज संघटित करून समाजाच्या विकासासाठी कुमावत को-ऑप. क्रेडिट सोसायटी, कोल्हापूर शहर माल उत्पादक सहकारी संस्था अशा संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ष 1947 मध्ये कुमावत संघाच्या माध्यमातून कला मंदिर ही चित्र-शिल्पकलेचे शिक्षण देणारी संस्था कोल्हापुरात स्थापन केली. त्यांना राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकासह अनेक पुरस्कार मिळाले. 31 मार्च 2004 रोजी त्यांचे निधन झाले.