50 टक्के वीजबिल माफीसाठी उरले 100 दिवस
11.85 टक्के शेतकऱ्यांनी घेतला लाभ
बारामती – बारामती परिमंडल कृषी वसुलीत अग्रेसर असले तरी सर्वाधिक थकबाकीही बारामती परिमंडलातच आहे. 4460 कोटींपैकी 597 कोटींचा भरणा झाला आहे.
परिमंडलातील फक्त 11.85 टक्केच शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. महावितरणच्या “कृषी योजना-2020′ ची मुदत आता 100 दिवसांवर येऊन ठेपली आहे. दि. 31 मार्च 2022 रोजी 50 टक्के माफीची मुदत संपणार असून एप्रिलपासून फक्त 30 टक्के माफी मिळणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना आवाहन करूनही तसेच बांधावर जाऊनही शेतकऱ्यांमधून अल्पसा प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यांपासून महावितरणविरोधात भाजपाने राज्यभर निदर्शने केली. त्यावेळी शेतकऱ्यांकडून वीज बिल भरणा कमी केल्याचे दिसत आहे.
बारामती परिमंडलात धोरणापूर्वी शेतीची थकबाकी 8 हजार 151 कोटींच्या घरात होती. दंड-व्याजातील सूट व निर्लेखणातून 2222 कोटी माफ झाले आहेत. सुधारित थकबाकीतही 50 टक्के थकबाकी माफ होत असल्याने शेतकऱ्यांना 50 टक्के हिश्श्यापोटी 2913 कोटी अधिक सप्टेंबर 2020 पासूनचे चालू बिल 1547 कोटी असे मिळून फक्त 4460 कोटी भरायचे आहेत.
या देय रकमेपोटी आतापर्यंत 597 कोटी 53 लाखांचा भरणा वर्षभरात झाला आहे. वसुलीचे हे प्रमाण केवळ 11.85 टक्के इतकेच आहे. योजनेसाठी पात्र 7 लाख 38 हजार शेतकऱ्यांपैकी 4 लाख 7 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला तरी केवळ 85 हजार 955 शेतकऱ्यांनीच योजनेचा संपूर्ण लाभ घेतला आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांनी कारवाई टाळण्याठी जुजबी रक्कम भरली आहे.
बारामती परिमंडल कृषी वसुलीत अग्रेसर असले तरी सर्वाधिक थकबाकीही बारामती परिमंडलातच आहे. वसुली वाढविण्यासाठी “एक गाव, एक दिवस’ उपक्रम फायदेशीर ठरत आहे. ज्या गावात वसुली, त्याच गावात काम असा निकष ठेवल्याने अनेक गावे वसुलीसाठी पुढे येत आहेत.
कृषी धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बांधावर, पारावर मेळावे घेतले जात आहेत. योजनेत सहभागी होऊन आपल्या कृषीपंपाची थकबाकीसह चालू बिले भरुन 50 टक्के माफी मिळवावी तसेच वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नका.
– सुनील पावडे, मुख्य अभियंता, महावितरण परिमंडल, बारामती.