मंचर – भात पिकांवर करपा, तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील 40 गावांतील भातशेती धोक्यात आली आहे. दाट धुके आणि रोगट वातावरणामुळे या पिकांवर परिणाम झाला असून, या रोगांमुळे भात पिके जळू लागली आहेत.
भात पिकावर करपा, तांबेरा व खोड किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भातपीक धोक्यात आले असून, प्रशासनाने योग्य दखल घेऊन कृषी विभागामार्फत या भागातील भाताची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुभाषराव मोरमारे आणि आदिवासी बांधवांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडल्यामुळे या भागात भात रोपे सडून गेली तर काही ठिकाणी बांध फुटून भात खाचरे गाडली गेली. यानंतर 20-25 दिवसांपासून येथे पावसाचा लपंडाव सुरू होता. पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या तीनही खोऱ्यांमध्ये भात पिकाला रोगांनी ग्रासले.
जिल्ह्यातील 63 हजार 800 हेक्टर भातक्षेत्रापैकी 5 हजार 100 हेक्टर क्षेत्रांवर आंबेगाव तालुक्यात भात लागवड होते, अशी माहिती शरद सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप आमोंडकर यांनी दिली. प्रशासनाने योग्य दखल घेऊन कृषी विभागामार्फत या भागात भाताची पाहणी करून पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी भीमाशंकर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक गणेश कोकणे यांसह आदिवासी बांधवांनी
केली आहे.
करपामुळे भातरोपांची पाती पिवळी पडून जळू लागतात, तर तांबेरामुळे भातरोपांची पाती तांबडी पडून सुकू लागतात. खोड किडा हा रोपाच्या मुळामध्ये शिरून पूर्ण भातरोप पोखरतो. अशा प्रकारे रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने भातपीक वाया जात आहे.
– संजय गवारी, माजी सभापती आंबेगाव