रेडा -इंदापूर तालुक्यातील व शहरातील ज्या शेतकरी व नागरिकांचे, घर, जनावरे, शेती अथवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले असेल, तर त्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा प्रशासनाने करावेत. तालुक्यातील एकही नागरिक व शेतकरी नुकसानीच्या पंचनानाम्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर शहरात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवार ( दि. 15 ) रोजी इंदापूर तालुक्यात व इंदापूर शहरात पावसाच्या पाण्यामुळे व पूर आलेल्या भागात नुकसान ग्रस्त नागरिकांची भेट घेतली.
यावेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, विठ्ठलराव ननवरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, पोपट शिंदे, अमर गाडे, प्रा.अशोक मखरे, सागरबाबा मिसाळ, हरिदास हराळे व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, सकाळपासून मी स्वतः अनेक ठिकाणी जाऊन पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून, मदतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी इंदापूर शहरातील रामवेस नाका, छत्रपती संभाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर, संत रोहिदास नगर, ठाकरगल्ली येथील पुराची पाहणी केली.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, बांधकाम विभागाचे अभियंता धनंजय वैद्य, अधिकारी उपस्थित होते.