इंदापूर : मुख्य बाजारपेठेतून शहरात चालत जावून तहसील व पोलीस प्रशासनास निवेदन दिले.
इंदापूर – येथून पुढे इंदापूर बंद नको. शहर वारंवार विविध कारणांमुळे बंद ठेवले जाते. त्यामुळे शहरातील व्यापारी बांधवांची गळचेपी व नुकसान होते. तसेच शहरवासीय नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.वारंवार शहर बंद थांबविण्यासाठी, इंदापूर शहर व्यापारी संघाच्या शेकडो व्यापार्यांनी तहसील व पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
इंदापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिरात एकत्र येत मुख्य बाजार पेठेतून मंगळवार (दि. 12) सकाळी तहसिल कार्यालय व पोलीस ठाण्यापर्यंत चालत जावून एल्गार केला. यामध्ये इंदापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भरत शहा, सचिव मेघःश्याम पाटील, उपाध्यक्ष संदीप वाशिंबेकर, सहसचिव दिलीप कासार, संजय दोशी, नरेंद्र गांधी, संजय बानकर, विकास किरकत व शहरातील शेकडो छोटे मोठे व्यवसायिक, व्यापारी, दुकानदार मोर्चात सहभागी झाले होते.
इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद केले आहे की, वेळोवेळी विविध संघटना, पक्ष यांच्याकडून काही घटना घडल्यास त्याचा निषेध म्हणून इंदापूर शहर बंदचे आवाहन करण्यात येते. त्यामुळे शहरातील सर्व छोटे़मोठे व्यापारी, व्यावसायिक यांना बंदमध्ये सहभागी व्हावे लागते. परंतु असे बंद वारंवार झाल्यामुळे व्यापार्यांसह कामगार, मोलमजुरी करणार्यांचे आतोनात नुकसान होत आहे.
असे असताना मागील काही वर्षामध्ये करोना काळ व मागील दसरा, दिवाळी आदी सणावारांच्या दिवशी ही अशाप्रकारचे बंद ठेवण्यात आले. ही बाब प्रशासनास आम्ही वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेली आहे. इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने निवेदने दिलेली आहेत; परंतु या विषयी प्रशासन आणि सामाजिक संघटना, सर्वच पक्ष यांनी दखल घेतलेली नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.