जांबूत (पुणे जिल्हा)- शिरूर तालुक्यातील बेट भागात गेली अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र वाढलेले आहे. मात्र, अद्यापही चोरीच्या घटनांमधील चोरट्यांना जेरबंद करण्यात शिरूर पोलिसांना अपयश आले आहे. आधीच्या चोऱ्यांचा तपास लागण्याआधीच गुरुवार (दि.18) पहाटेच्या सुमारास पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दाभाडेमळा परिसरात दरोडेखोरांनी दरोडा घालून सुमारे पावणेसहा लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेत पोबारा केला.
याबाबत प्रदीप बाळू दाभाडे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. दाभाडे कुटुंबीय हे रात्री अकराच्या दरम्यान जेवण करून आपापल्या खोलीत झोपले असताना मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी झालेल्या आवाजाने प्रदीप दाभाडे व पत्नी पूजा जागे झाले असता त्यांच्याजवळील कोयता, गलूर व दांडक्याचा धाक दाखवत कटावणीने कपाटाचे लॉकर तोडून दागिने व पत्नीच्या अंगावरील दागिने काढून दे, असा दम देऊन दागिने काढून घेतले.
शेजारील एका खोलीत झोपलेले आतेभाऊ निलेश डुकरे, भाऊ राहुल दाभाडे व भावजय अनुजा दाभाडे व दुसऱ्या खोलीतील वडील बाळू व आई अरुणा झोपले होते. यावेळी दरोडेखोरांचा आवाज ऐकून भाऊ व भावजय यांनी आरडाओरडा चालू केला. मात्र; खोलीचा दरवाजा बंद असल्याने दरोडेखोरांनी बाहेरून येऊन दरवाजावर दगड घालण्याचा प्रयत्न केला.
इतर दरवाजांच्या कड्या लावून घेत घराबाहेर गोठ्यात झोपलेली आजी शांताबाई दाभाडे हिला घेराव घालून तिला मारहाण करीत दागिने काढून घेतले. यात कानातील झुमके, सोन्याची ठुशी, मणी मंगळसूत्र, टॉप्स, नाकातील नथा, चंद्रकोर माळ, कानातील खुटबाळ्या, कानातील वेल चोरून नेले. त्याच्या घराजवळच अंजनाबाई धोंडिभाऊ दाभाडे यांच्या घराकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळवून कपाटातील सोन्याचे वेल व रोख रक्कम पाच हजार रुपये, असा 17 हजारांचा ऐवज लुटून चोरट्यांनी पलायन केले.
तपासणी पथक रवाना –
चोरीतील दोन दरोडेखोर हे 25 ते 30 व दोनजण हे 30 ते 40 वयोगटातील आहेत. त्यांनी काळ्या रंगाची पॅन्ट-शर्ट परिधान केलेले आहे. दोघेजण सडपातळ तर दोघेजण जाड असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. शिरूर पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी केली असून घटनास्थळी सापडलेल्या वस्तूवर चोरट्यांच्या बोटांचे ठसे (फिंगर) तपासणी पथक व श्वानपथकाला पाचारण केले आहे.
मागील गुन्ह्याचा तपास थंडावला –
चार महिन्यांपूर्वी पंचतळे परिसरात जाधव कुटुंबीयांची झालेली जबरी चोरी, पंचतळे, जांबूत, पिंपरखेड भागातील फोडलेली दुकाने, मेडिकल, तर टाकळी हाजी, माळवाडी, पिंपरखेड या भागातील शेतकऱ्यांचे कृषी पंप, केबल चोरी, कृषीयंत्र चोरी, दुचाकी चोऱ्या तसेच टाकळी हाजी, माळवाडी परिसरातील डाळिंब चोरी, कवठे येमाई, जांबूत येथील कळमजाई मंदिरातील देवीच्या दागिन्यांची चोरी आदी घटनांचा तपास अद्यापही लागला नाही. यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलिसांचा धाकच राहिला नाही –
चोरीच्या घटनेतील आरोपींवर बेधडकपणे होत नसलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून पिंपरखेड येथील दोनही जबरी चोरीच्या घटनेतील चोरट्यांना जेरबंद करण्याचे आवाहन शिरूर पोलिसांसमोर उभे ठाकल्याने तपासाला गती देत आरोपींना तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.