सविंदणे – टाकळी हाजी येथील तामखरवाडी येथील दोन नागरिकांवर हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी कुटुंबातील या दोन व्यक्तींवर बिबट्याने शुक्रवारी (दि. 13) दुपारी साडेबाराच्या दरम्यान ढवळ्या दिवसा हल्ला केला असून यामध्ये अनिता सुरेश पाचंगे नदीवरील विद्युत पंप चालू करून पाणी ओढल्याचे पाहत असताना तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप टाकली.
त्यांच्या हाताला दुखापत झाली असून जोराने आवाज करत प्रतिकार केल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावल्या. यानंतर काही तासांतच तेथील शेतकरी कैलास ठकाजी गावडे शेतात शेळ्या चारत असताना बिबट्याने शेळीवर हल्ला केला. गावडे यांनी हे पाहताच त्यांनी बिबट्या हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने गावडे यांच्यावर मोर्चा वळवला. बिबट्या मागे लागल्यामुळे त्यांनी शेळ्या तेथेच सोडून घराकडे पळ काढला.
म्हसे येथे महिलेवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, सोसायटीचे संचालक संतोष गावडे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
बिबट्यापासून पशुधन वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी गायींच्या गोठ्याला लाखो रूपये खर्च करून बांधकाम व तारेचे बंदिस्त कुंपण केले आहे. बिबट्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे.
शालेय मुलांची सुरक्षा धोक्यात
रात्री फिरणारे बिबट कळपाने रस्त्यावर, शाळेच्या आवारात येऊ लागल्याने शालेय मुलांची सुरक्षितता धोक्यात आली असून वनविभागाकडून बंदोबस्त करण्याऐवजी फक्त जनजागृती केली जात आहे.
अंगणात खेळणेही धोकादायक
शेतकऱ्यांची घरे शेतात असल्याने घराच्या अंगणाच्या समोर पाठीमागे काही शेजारच्या शेतात असलेल्या ऊसाच्या पिकात बिबट्याचे वास्तव्य असल्याने लहान मुलांना अंगणात पूर्वीसारखे बागडणे अवघड झाले आहे.