जांबूत : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दत्तवाडी येथे गुरुवारी (दि.४) सकाळी सहा वाजता बिबट्याने एका कालवडीवर हल्ला केला. या हल्ल्यात कालवड गंभीर जखमी झाली आहे.
बिबट्याच्या पाळीव प्राण्यावरील हल्ल्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. वनविभागाकडून उपाययोजना होत नसल्याने बेट भागातील नागरिक वनविभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहे.
दत्तवाडी येथे पिंपरखेड-जांबूत रस्त्याच्या कडेला सकाळी सहाच्या सुमारास शेतकरी कांताराम ज्ञानेश्वर टाकळकर यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला. यावेळी टाकळकर यांनी आरडाओरडा करीत बिबट्याला हाकलून लावले.
हल्ल्यात कालवडीच्या मानेला गंभीर जखम झाल्याचे टाकळकर यांनी सांगितले. यापूर्वी दबा धरून येत असलेला बिबट्या धीटपणे मानवी वस्तीवर येत आहे. बिबट्याचा वाढता वावर हा धोक्याचा इशारा असतानाही वनविभाग याकडे पध्दतशीरपणे दुर्लक्ष करीत आहे.
बुधवारी (दि.३) रात्री गणेश चौक येथे लाईटच्या प्रकाशात बिबट्या रस्त्यावर अवतरला. शिकारीच्या शोधात आलेला या बिबट्याला श्रीराम दाभाडे, सोपान दाभाडे, चांगदेव दाभाडे, नामदेव दाभाडे यांनी फटाके वाजवून पळवून लावले. आठ दिवसांत बिबट्या दुसऱ्यांदा आल्याचे दाभाडे यांनी सांगितले.