लोणी काळभोर – यशवंत साखर कारखाना पुन्हा एकदा चालू करून, हवेली व दौंड तालुक्यातील शेतकर्यांना पुनरुज्जीवीत करण्याचा आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा खरा प्रयत्न राहणार आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमच्या बाजुने सर्वोतोपरी प्रयत्न केले; मात्र विरोधकांनी जिरवाजिरवीचे राजकारण केल्याने ही निवडणूक लागली आहे. सत्ता मिळवण्यासाठी विरोधक कोणत्याही थराला जाऊ शकतात.
अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार कारखान्याच्या व शेतकर्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करतील, अशी ग्वाही अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप यांनी दिली.
लोणी काळभोर भागातील सभासदांच्या गाठीभेटी घेत असताना बाळासाहेब चौधरी, प्रशांत काळभोर यांच्यासह उमेदवारांसमवेत प्रकाश जगताप माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, यशवंतच्या दिवाळखोरीला खरेतर हेच कारणीभूत असून एक इंचही जागा न विकता यशवंत सुरु करू अशा वल्गना आज हे करत आहेत.
परंतु माजी संचालक पांडुरंग काळे साखर कारखाना वाचवत असताना या मंडळींनी साधी लोकवर्गणी ही न देता हास्यास्पद वक्तव्य करत खिल्ली उडवण्याचे काम केलं. हवेली तालुक्याची अस्मिता असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची उर्वरित जमीनही बांधकाम व्यावसायिकांना द्यायची भूमिका यांची आहे. करोडोंच्या वल्गना करायच्या आणि सभासदांच्या लोकवर्गणीतून सुरू झालेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरती डोळा ठेवायचा हिच यांची जाऊ तिथे खाऊ भूमिका आहे.
पूर्व हवेली तालुक्याची अस्मिता आणि सर्वसामान्य शेतकर्यांचा आर्थिक गणित जुळवण्यासाठी हा कारखाना पुन्हा सुरू होणं ही काळाची गरज आहे. याची जाण अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलला आहे. यामुळे सर्व सभासद निवडुकीत आम्हाला साथ देतील असा विश्वास वाटतो.
सभासदांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल
यशवंत सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू होण्यासाठी पांडुरंग काळे यांनी केलेलं काम सर्व सभासदांना माहित आहेच. आज त्यांच्याच घरातील तरूण मोरेश्वर काळे हा कारखाना वाचवण्यासाठी घरोघरी फिरत आहे. आज ही तरुणपिढी आणि प्रशांत काळभोर, बाळासाहेब चौधरी यांच्यासह आम्ही हा यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा संकल्प केला आहे. सभासदांच्या मनातील इच्छा पूर्ण करणे हीच आमची भूमिका आहे.