राहाता – कोणाला किती मोर्चे आणि आरोप करायचे ते करू द्या. या आरोपांना आपण दोन महिन्यांनी उत्तर देऊ. सध्या तालुक्यात बऱ्याच ‘मंथरा’ फिरत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. तालुक्याचा सुसंस्कृतपणा सोडू नका. गावातील प्रत्येक कार्यकर्त्याने दहा कुटुंबीयांपर्यंत योजना पोहचवून विरोधकांना कामातून उत्तर द्या, असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे विखे पाटील यांनी केले.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचतगटांना स्वंयरोजगाराचे साहित्य, बांधकाम कामगारांना संरक्षण किटचे आणि भांड्याच्या सेटचे वापट खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
आज तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने ३७ व्या वर्षी खासदार झालो. नगर दक्षिणमध्ये चांगले काम केले. त्या भागातील लोकांना न्याय देताना इकडेही काम करायचे आहे. त्यामुळे सध्या कोण मोर्चे काढतो, कोण काय आरोप करतो, याकडे माझे लक्ष नाही. दोन महिन्यांनी आपल्याला उत्तर द्यायचे असल्याचा इशारा देऊन खासदार डॉ.विखे पाटील म्हणाले की, आपल्याला कोणाला अपमानित करायचे नाही. कारण आपल्यावर खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा संस्कार आणि शिकवण आहे. त्यांचीच संघटना आपल्याला पुढे घेऊन जायची असल्याचे खासदार विखे यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे आपल्यावर निळवंडेच्या प्रश्नावरुन आरोप झाले. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून, या धरणातून जिरायती भागाला पाणी सोडण्याचे भाग्यही विखे पाटील परिवारालाच मिळाले.
तालुक्यात आरोप-प्रत्यारोप करीत सध्या फक्त ‘मंथरा’ फिरत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, अशी मिश्कील टिप्पणी खासदार विखे पाटील यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.धनंजय धनवटे यांनी केले. या कार्यक्रमात महिला बचत गटांना मंजूर झालेल्या कर्जाचे धनादेश तसेच विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.