टाकळी भिमातील मानवी वस्तीत वावर वाढला
राहू – दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरातील टाकळी भीमा परिसरातील एक जायबंदी झालेल्या बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर हा दिवसेंदिवस वाढल्याचे दिसून येत आहे. अलीकडील पंधरा दिवसाच्या कालावधीत तो रोज किंवा एका दिवसाआड दर्शन देऊ लागला आहे. प्रत्यक्षदर्शी अनेक जणांच्या मते तो मागील एका पायाने जायबंदी आहे. त्याचा पळताना वेग देखील कमी आहे. त्यामुळे त्याला शिकार करणे अवघड जात आहे.
मानवी वस्तीत त्याचा वावर वाढला आहे. अपंगत्वामुळे त्याला जर शिकार मिळाली नाही, तर तो मानवावर देखील हल्ला करू शकतो. कारण मनुष्य हे त्याचे कमी कष्टात होणारी शिकार ठरू शकते. याचा वन विभागाने विचार करणे गरजेचे आहे. अनेक वर्षांत नरभक्षक बिबट्यांनी किती गोंधळ घातला आहे, याचा अनुभव गावकऱ्यांना आहे.
पिंजरा गायब
गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी बिबट्याच्या तक्रारी करण्याचेच सोडून दिले आहे. कारण तक्रारीचा वन विभागावर काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही. एवादे रोज बिबटे दिवसा मानवी वस्तीती घुसलेली उदाहरणे आहेत. परंतु एकही बिबट्या जेरबंद झालेला नाही. अनेक दिवसांपासून पिंजरा हा वन विभागाने अडगळीत टाकलेला आहे. सध्या ऊस तोड चालू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे फड मोकळे झाले आहेत. हे बिबटे सैरावैरा झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
टाकळी भीमा परिसरातील योग्य ती माहिती घेऊन व चौकशी करून कार्यवाही केली जाईल. यादृष्टीने परिसरात लोकांमध्ये जागृती करणार आहोत.
– शिवकुमार बोंबले, वनरक्षक राहू.