सकाळी निषेध मोर्चा : तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत आळंदी ग्रामस्थांना विश्वस्तपदी डावलल्याने मंगळवारी (दि. 5) पुकारण्यात आलेल्या आळंदी बंद बाबात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आळंदीकरांचा अपमान केला आए. त्यांनी आळंदी ग्रामस्थांची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आळंदी ग्रामस्थांनी दिला आहे.
आळंदी पोलीस ठाण्यामध्ये आळंदी बंद बाबात आळंदी ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्यात बैठक बोलवण्यात आली होती, यामध्ये पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. कार्तिक वद्य अष्टमी निमित्ताने मंगळवारी (दि. 4) सकाळी नऊ वाजता श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजनाने कार्तिकी यात्रास सुरुवात होणार आहे.
परंपरेनुसार चालत आलेल्या सर्व धार्मिक विधीसाठी आळंदी ग्रामस्थांचा विरोध असणार नाही. निषेध मोर्चा सकाळी दहा वाजता चाकण चौक येथून सुरू होऊन प्रदक्षिणा मार्गावरून महाद्वार चौकात येईल तिथेच निषेध सभेचे आयोजन करण्यात येणार असून पुढील आंदोलनाची दिशा त्याच दिवशी जाहीर करण्यात येईल असे आळंदी ग्रामस्थांनी सांगितले आहे.
पोलिसांचे आवाहन…
आळंदी बंदबाबतीत आळंदीकर ग्रामस्थांच्या ज्या भावना आहे त्या वरिष्ठांना कळविण्यात येईल तसेच कार्तिकी यात्रेसाठी आळंदीत येणार्या भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.