कोरमअभावी तहकुबीची वेळ : गावकारभाऱ्यांमध्ये निरुत्साह : नागरिकांनी फिरविली पाठ
मयूर भुजबळ
तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या म्हणून गणल्या जाणाऱ्या तळेगाव ढमढेरे गावची ग्रामसभा दरवेळी गणपूर्तीअभावी तहकुब होत आहे. त्यामुळे नागरिकांची ग्रामसभेबाबत उदासीनता दिसून येत आहे. कोरमअभावी ग्रामसभा तहकुबीची वेळ गावकारभाऱ्यांवर येत आहे. याकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गावविकासाच्या घटकात महत्त्वाची भूमिका असलेल्या ग्रामसभेचा हेतू विफल होत आहे.
तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायतीची गेल्यावर्षी 2 ऑक्टोंबर रोजी ग्रामसभा गणपूर्ती पूर्ण होऊन सभा झाली. परंतु त्यानंतर झालेल्या सर्व ग्रामसभा या गणपूर्तीअभावी तहकुब झाल्या. नुकतीच (दि.8) झालेली ग्रामसभा गणपूर्तीअभावी तहकूब झाल्याने ही तहकूब ग्रामसभा सरपंच अंकिता भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली (दि.22) ग्रामपंचायत कार्यालयात झाली. परंतु तहकूब ग्रामसभेला मोजकेच 15 ते 20 ग्रामस्थ उपस्थित होते. तर निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्य व काही शासकीय अधिकारी उपस्थित नव्हते.
शासन गावातील ग्रामसभेला जास्तीत जास्त गावातील ग्रामस्थ उपस्थित राहावे यासाठी ग्रामपंचायतीकडून नवनवीन उपाययोजना कराव्यात, यासाठी वारंवार सूचना करीत आहे. परंतु ग्रामसभेला ग्रामसभा कोरम पूर्ण करण्यासाठी लागणारी शंभरची गणपूर्ती होत नसल्याने आलेल्या सभा तहकुब झाल्याने निराशा होत आहे. विशेष म्हणजे लोकांनी निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्यांनाच ग्रामसभेला हजर राहण्यासाठी फुरसत मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्यामुळे प्रत्येक ग्रामसभा तहकुब होत असल्याने ग्रामस्थ ग्रामसभेला न येण्याचे पसंद करीत आहेत. ग्रामपंचायत सदस्य, शासकीय अधिकारी, आशासेविका, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी इतके जरी उपस्थित राहिले तरी ग्रामसभेला आवश्यक असणारी गणपूर्ती होत नाही. ग्रामसभा वारंवार तहकूब होत असल्याने गावातील विकासकामांच्या चर्चेला खीळ बसत आहे. दैनंदिन कचऱ्यासारखा सर्वात मोठा नागरिकांना भेडसावणारा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला आहे.
जनजागृतीची गरज ‘अधोरेखित’
ग्रामसभेसाठी गावातील सर्व शासकीय अधिकारी यांनी गावातील नागरिकांनी शासनाच्या योजनाची माहिती नागरिकांना देण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. परंतु अधिकारीच ग्रामसभेला अनुपस्थित राहत असल्याने “शासकीय योजना फक्त कागदावरच’ असा नागरिकांचा संभ्रम झाला आहे. गावपातळीवरील सर्वोच्च ससंद मानल्या जाणाऱ्या ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी तसेच ग्रामसभेला जास्तीत जास्त ग्रामस्थ उपस्थित राहण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर नागरिकांमध्ये जनजागृती तसेच विविध उपाययोजना करण्याची आवश्यकता “अधोरेखित’ होत आहे.