ज्ञानेश्वर फड
आळंदी – वासुदेव हरी । वासुदेव हरी ।
सकाळच्या पारी आली
वासुदेवाची स्वारी ।।
वासुदेव हरी…
म्हणत भल्या पहाटे येणारे आणि सर्वांना झोपेतून जागवणारे वासुदेव आजच्या धकाधकीच्या व डिजिटल युगात पडद्याआड गेल्यासारखेच जाणवत आहे. सुमारे हजार-बाराशे वर्षे जुनी ही परंपरा आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि विशेष करून संत एकनाथ महाराज यांच्या साहित्यात वासुदेवावरील अनेक रूपके आढळतात. वारीमध्ये ही परंपरा पाहायला मिळते. मंगळवारी (दि. 21 जून) माऊलींचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने वासुदेव आळंदीत आले आहेत. गोड आवाजात विठ्ठलाचं भजन गात भाविक वारकऱ्यांना भक्ती सागरात न्हाऊ घालत आहेत.
यावेळी वासुदेव पांडुरंग भांडे (वय 72, पाथरी रोड, महात्मा गांधी नगर, परभणी) म्हणाले की, आमची ही वडिलोपार्जित परंपरा आहे. पूर्वी आजोबा, नंतर वडील आणि त्यानंतर मी देखील दरवर्षी आषाढीची वारी करतो. देवाचे भजन गात असतो.
काही भाविक आमचे भजन ऐकून आम्हाला आर्थिक मदत करतात. त्यावर आमची गुजराण होते. विठ्ठलाचे भजन गाऊन भक्तीही होते आणि भाविकांनी केलेल्या आर्थिक मदतीतून प्राथमिक गरजा भागतात. वारी आली की खूप आनंद वाटतो. तोतीराम रामचंद्र शिंदे (यवतमाळ), नारायण माधव कानडे (वर्धा), राजू परशराम रेणके (यवतमाळ), लक्ष्मण हांडे (जळगाव) यांसह अनेक वासुदेव वारीसाठी आळंदीत आले आहेत.