धनगर आरक्षणप्रश्नी ढोणे यांचे आवाहन : बारामतीत “जवाब दो’ आंदोलन
बारामती – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना गेल्या महिन्यात बारामतीत आणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून धनगर समाजाला प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला. त्या कार्यक्रमात एसटी आरक्षणाबाबत भरभरून आश्वासने देण्यात आली. त्यानंतरच्या घडामोडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत गेला असल्याने एसटी आरक्षण प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी पुढाकार घ्यावा. ज्याप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी स्थानिक कुरूबा (धनगर) समाजाच्या एसटी समावेशासाठी केंद्र सरकारला शिफारस पाठवली, तशी प्रक्रिया महाराष्ट्रातही घडवून आणावी, असे आवाहन धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.
बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर धनगर विवेक जाग्रती अभियानाच्यावतीने “जवाब दो’ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. एसटी आरक्षणप्रश्नी बारामती येथे जुलै 2014 मध्ये ऐतिहासिक आंदोलन झाले. या आंदोलनासाठी तत्कालिन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे 29 जुलै रोजी बारामतीत आले होते. भाजपची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करू, असे आश्वासन फडवणीस यांनी दिले होते. फडणवीस यांनी आश्वासन दिलेली 29 जुलै ही तारीख आम्ही विश्वासघात दिवस म्हणून पाळत आहोत. यानिमित्ताने धनगर एसटी आरक्षण प्रश्नी राज्य शासनाने केलेल्या सकारात्मक कार्यवाहीबाबतचे उत्तर आम्हाला हवे आहे, असे ढोणे यांनी सांगितले.
ढोणे म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार उपमुख्यमंत्री बनले आहेत तर कर्नाटकातील कुरूबा- धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी सिद्धरमय्या सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस पाठवली आहे. कर्नाटकातील शिफारस हा देशभरातील धनगर समाजासाठी आनंदाचा विषय आहे. त्यादृष्टीकोनातून महाराष्ट्रातील प्रश्न सुटावा, अशी अपेक्षा आहे. अजित पवार यांनी गेल्या पाच वर्षात आरक्षणप्रश्नी डोक्याला पिवळा फेटा बांधून आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना या प्रश्नाची जाण आहे, असे आम्ही मानतो. बारामतीतील कार्यक्रमात अजित पवार यांच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रश्नी संघर्ष करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आणि विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने धनगर समाजाविषयी कृतीशील प्रेम दाखविणे गरजेचे आहे.
आंदोलनाच्या निमित्ताने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्री. करे यांना देण्यात आले. आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, मंत्री समिती स्थापून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रवीण गडदे, बाळू मासाळ, अशोक गोरड, पोपट धवडे, चंद्रकांत वाघमोडे, तुकाराम कित्तूरे, तानाजी कटरे, युवराज हाके, काशिराम पडोळे, नंदकुमार पांढरे, अक्षय कोळेकर, बबन पडोळे, बबन खांडेकर, भरमाना खांडेकर, संजय पडोळे रफिक मंगळवेढे, युवक आंदोलनात सहभागी झाले होते.
निर्णायक भूमिका बजावू शकतात
सद्यःस्थितीत अजित पवार यांचे भाजपश्रेष्ठींकडील वजन पाहता ते याप्रश्नी निर्णायक भूमिका बजावू शकतात, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे अजित पवार यांनी सिद्धरमय्यांचा आदर्श घेऊन धनगर समाजाचा प्रश्न सोडविण्याचे धैर्य दाखवावे, असे आवाहन ढोणे यांनी केले.