पॅरिसमध्ये पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. त्यात भारताचे स्टार खेळाडू पात्र ठरणार हे तर निश्चितच आहे; परंतु केवळ पात्र ठरून काय होणार आहे. तेथे ते कशी कामगिरी करतात यावर सर्वकाही अवलंबून राहणार आहे. मुळातच जे खेळाडू पात्र ठरतील त्यांची वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोखा काढला तर त्यांच्याकडून पदकाच्या आशा करणे स्वप्नवत वाटत आहे.
भारताकडे बॅडमिंटनपटूंचा ताफा आहे, तो सशक्तही आहे; परंतु तो ऑलिम्पिक दर्जाचा राहिला आहे का, हाच प्रश्न आहे. नवोदितांची नावे घ्यायची तर एकाच हाताची बोटे पुरतात नव्हे उरतात. अशा परिस्थितीत पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, पी. कश्यप, सात्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांच्यावरच आपला भर राहणार हे तर उघड आहे. मात्र, त्यांची कामगिरी सिझनल फळांसारखी आहे, त्यात सातत्य नाही. त्यांनी यंदाच्या तसेच गेल्या मोसमात काही स्पर्धा जिंकल्या आहेत; पण त्यानंतरचा त्यांच्या कामगिरीचा आलेख कायम राहिलेला नाही. लक्ष्य सेनने नुकतीच कॅनडा ओपन जिंकली; पण लगेचच अमेरिकन स्पर्धेत त्याला पराभव स्वीकारावा लागला.
सिंधू तर काय हल्ली उपांत्य फेरीपर्यंतच पोहोचते, पुढे पराभव वाढलेलाच असतो. त्यातच पी. कश्यप हा सोहळ्यासारखा किंवा जत्रेत जावे तसे एखाद्याच स्पर्धेत खेळतो. श्रीकांत व रांकीरेड्डी आणि चिरागकडूनच काय त्या अपेक्षा आहेत. या जोडीने गेल्या दोन मोसमांपासून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे सर्वोत्तम समन्वय आहे व त्याच जोरावर ते इंडियन एक्सप्रेस म्हणूनही नावारूपाला आले आहेत. मात्र, हे दोघेही खेळाडू केवळ दुहेरीतच खेळतात. कारकिर्दीतील तिसऱ्या क्रमांकावर असलेली ही जोडी पॅरिसमध्येही यशस्वी ठरली तर भारतीय बॅडमिंटनकडे वळणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढेल, असा विश्वास वाटतो.
2018 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या जोडीने सुवर्णपदकाला गवसणी घातली व तेव्हापासून ते सातत्याने यश मिळवत आहेत. अर्थात, केवळ 1000 सीरिज स्पर्धेतच रममाण होऊन चालणार नाही, तर ध्येय ऑलिम्पिक पदकाचे ठेवायला हवे. स्वप्न पाहायची सवय लागली तरच ते पूर्ण करण्याची हिंमत येते. 2019 साली त्यांनी थायलंड ओपन जिंकली, ती अभिमानास्पद कामगिरी ठरली होती. कारण जागतिक बॅडमिंटनवर चीन, थायलंड, जपान, कोरिया अशा देशांचे असलेले वर्चस्व या जोडीने मोडून काढले होते. मात्र, त्यांच्याकडे सातत्याचा अभाव आहेच. असा एकही मोसम नाही की त्यांनी सलग स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र, आता असे करून चालणार नाही. पॅरिस स्पर्धा तोंडावर आलेली असताना यंदाच्या मोसमात व पुढील वर्षी ऑलिम्पिकपूर्वी होत असलेल्या स्पर्धांमध्ये त्यांना कमालीचे सातत्य व यश मिळवावे लागेल तरच ऑलिम्पिक पदक मिळवून मायदेशी ताठ मानेने येता येईल.
सिंधू काय करणार?
भारताची नवी फुलराणी अशी सार्थ ओळख मिळवलेली पी. व्ही. सिंधू सध्या केवळ विविध स्पर्धांमध्ये हजेरी लावताना दिसते. आता परवाच तिला अमेरिकन ओपन स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर तिने निराशा व्यक्त केली. ही स्पर्धा गमावणे आपल्यासाठी खूपच चिंताजनक असल्याचे तिने म्हटले. एकेकाळची जागतिक विजेती असे म्हणते तेव्हाच तिची देहबोली किती निराशावादी बनली असेल याची कल्पना येते. तिने एकदा नव्हे तर दोन वेळा ऑलिम्पिकची पदके मिळवली आहेत. मात्र, तो दर्जा व तो फॉर्म आता तिच्या खेळात दिसत नाही. जगात ज्यांची मक्तेदारी राहिली होती, त्यांनाही जमिनीवर आणणारी ती सिंधू ही नव्हेच हे सहज लक्षात येते. आधी भारतीय प्रशिक्षक मग आता परदेशी प्रशिक्षक असा तिचा प्रवास सुरू आहे. प्रशिक्षक कोणीही असो खेळाडूने जिगर दाखवली तरच निर्णय आपल्या बाजूने येतो. एकलव्याला तरी कुठे द्रोणाचार्यांनी स्वतः शिकवले होते. तरीही महान तिरंदाज म्हणून अर्जुनाच्या बरोबरीने त्याचेच नाव घेतले जाते.
अंगठा कापून दिला तरीही त्याचे महत्त्व कमी झाले नाही. जोपर्यंत आत्मविश्वास आहे तोपर्यंत सर्वकाही शक्य आहे. सिंधूने चीन, जपान, कोरिया, थायलंड, मलेशिया या देशांची मक्तेदारी मोडून काढली व जागतिक स्तरावर पहिल्या पाच खेळाडूंमध्ये आपल्या नावाची वर्णी लावली. तीच सिंधू आज कुठेतरी उपांत्यपूर्व किंवा फार तर उपांत्य फेरीतच गारद होताना पाहावत नाही. पॅरिसला रवाना होण्यापूर्वी तिला आणखी काही स्पर्धांमध्ये खेळायचे आहे. आशियाई स्पर्धा आहेतच. ऑल इंग्लंड विजेते माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली ती जेव्हा खेळत होती तेव्हाच तिचा खेळ जागतिक दर्जाचा होत होता. कारण जेव्हापासून तिने गोपीचंद अकादमी सोडली तेव्हापासून तिचा खेळ खालावला. यातील राजकारणाचा भाग किती यावर न बोललेलेच बरे; परंतु आपले नुकसान व लाभ कशात आहे हे जर ओळखता येत नसेल तर प्रशिक्षक कोणताही असो कामगिरी सुधारणार नाही. हे जितक्या लवकर सिंधूच्या ध्यानात येईल तितक्या लवकर ती यश प्राप्त करताना दिसेल. तिच्या कामगिरीत ते पूर्वीचे सातत्य पुन्हा दिसावे व तिने पॅरिसमध्येही पदक मिळवत मायदेशी परतावे हीच अपेक्षा आहे; पण ते पदक सोनेरी असावे इतकेच.
श्रीकांत, लक्ष्यवरही मदार
भारतीय बॅडमिंटनबद्दल बोलताना जास्त कौतुकाने बोलावे अशी कामगिरी सध्या किदाम्बी श्रीकांत व लक्ष्य सेनच करत आहेत. ज्यांच्याकडे पाहून आपणही ऑलिम्पिक पदकच नव्हे तर येत्या काळात ऑल इंग्लंड स्पर्धाही जिंकू असा विश्वास केवळ तेच देत आहेत. मात्र, सातत्याच्या अभावाचा शाप त्यांनाही आहेच. या दोन खेळाडूंनी भारतीय बॅडमिंटनची कक्षाच बदलून टाकली आहे. स्पर्धा कोणतीही असो त्यांच्या खेळावर कोणतेही दडपण जाणवत नाही. श्रीकांत व लक्ष्य यांचे यासाठीच कौतुक वाटते की ते मोठ्या खेळाडूसमोर खेळतानाही दबकून जात नाहीत. येत्या काळात अनेक स्पर्धा होणार आहेत व त्यात या दोघांच्याच कामगिरीवर मदार राहणार आहे. पॅरिसला जाताना गतकाळात आपण किती स्पर्धा जिंकल्या याला जरी महत्त्व नसले तरीही त्यातून मिळणारी आत्मविश्वास नावाची शिदोरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
श्रीकांत जास्त प्रगल्भ वाटतो कारण तो प्रत्येक लढतीपूर्वी त्या खेळाडूचा अभ्यास करतो. त्याचे कमकुवत दुवे हेरतो व त्यानुसार आपल्या खेळात बदल करतो. लक्ष थोडा वेगळा आहे. प्रत्येक सामन्याचा स्वतंत्र विचार करत समोर कोणताही खेळाडू असला तरीही आपला नैसर्गिक खेळ सोडायचा नाही हे त्याचे ब्रिद आहे. क्रिकेटमध्ये जसा सेहवाग होता तसाच बॅडमिंटनमध्ये लक्ष्य आहे. अत्यंत आक्रमक परंतु तितकाच बेदरकार. या त्याच्या स्वभावामुळेच त्याला हातातोंडाशी आलेले विजय गमवावे लागले आहेत. कॅनडा स्पर्धा जिंकल्यावर तो अमेरिकन स्पर्धेत अपयशी ठरला ते याच अतिआक्रमकतेमुळे. आक्रमकतेला शिस्तीचीही जोड असावी लागते म्हणतात ते खोटे नाही.
सायना तर गायबच
एकेकाळी क्रिकेटच्या छत्रछायेखालून बॅडमिंटनला बाहेर काढत जागितक स्तरावर आपली नवी ओळख निर्माण करणारी देशाची पहिली फुलराणी सायना नेहवाल सध्या काय करत आहे हे तर “ती सध्या काय करते’ असाच प्रकार आहे. शालेय स्तरावरील नेत्रदीपक यश ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. कोणा बॉलीवूडकर दिग्दर्शकाला तिच्या कारकिर्दीवर चित्रपट तयार करावा वाटवा त्यातच तिची महानता सिद्ध होते. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुखापती म्हणा किंवा भारतीय बॅडमिंटनमधील राजकारण म्हणा ती या खेळापासूनच दुरावली आहे. विवाह झाल्यावरही कोर्टवर परतणाऱ्या अनेक सुपरमॉम आपण पाहिल्या आहेत. सायनाही त्यातीलच एक वाटत होती. मात्र, ती तिचीच ओळख हरवून बसली आहे. एक भारतीय महिला बॅडमिंटनपटू दिग्गज देशांच्या खेळाडूंना सहजरीत्या पराभूत करते व जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी येते हेच एक स्वप्न होते ते सायनाने करूनही दाखवले होते. आज मात्र, ती कुठेच नाही व त्याचाच जास्त त्रास होतो. तिनेही या नैराश्याच्या दुखापतींच्या कोशातून बाहेर यावे, पात्रता स्पर्धा खेळाव्यात व पॅरिस पात्रता मिळवावी. तिने जर पॅरिसला पदक मिळवले तर तिच्या कारकिर्दीसाठी ती नवसंजीवनी ठरेल यात शंका नाही.
अमित डोंगरे