महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने अमलबजावणी
खडकवासला – खडकवासला मतदारसंघातील ग्रामीण विभाग आणि पानशेत विभाग पूर्वीपासून महावितरणच्या मुळशी तालुक्यातील भरे येथील कार्यालयाशी जोडला आहे. खानापूर परिसरातील लोकांची गैरसोय होत असल्याने याची दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी लावत खानापूर येथे दोन दिवस अधिकारी उपलब्ध होणार आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने अमलबजावणी केली.
ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती, नवीन कनेक्शनचे कोटेशन जमा करण्यासाठी भरे येथे जावे लागते. खानापूर येथे पूर्वी बिल दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली झाल्यामुळे हे काम दोन महिन्यांनपासून बंद आहे. अनेक लोकांनी वीजबिल भरलेले नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीत वीज तोडण्याची टांगती तलवार त्यांच्यावर होती.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भाग आणि वेल्हे तालुक्यातील ग्रामीण भाग एकत्र करून स्वतंत्र कार्यालय सुरु करण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे विधानसभा प्रमुख नितीन वाघ व जिल्हा समाजकल्याण दक्षता व नियंत्रण समिती सदस्य संतोष शेलार यांनी महावितरण समितीचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आणि कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांची कार्यालयात भेट घेतली.
समस्यांबाबत चर्चा केली. सांबरेवाडी, कुडजे, मांडवी, बहुली, भगतवाडी व गायकवाडवाडी येथे काही ठिकाणी नवीन डीपी बसविणे, क्षमता वाढविण्याची मागणी केली. खानापूर येथील वीजवाहक तारा खराब झाल्यामुळे व त्याची पावडर होत असल्यामुळे त्या बदलण्याची मागणी करण्यात आली.
खानापूरमध्ये दोन अधिकारी जाणार
राजेंद्र पवार यांनी तातडीने भरे येथील दोन अधिकारी आठवड्यातून एक दिवस खानापूरमध्ये काम करतील, अशी सूचना केली. माणिक राठोड यांनी तातडीने कार्यवाही करून प्रत्येक गुरुवारी सकाळी दहा ते तीन या वेळेत हे अधिकारी खानापूर येथे उपलब्ध राहतील, असे पत्रक जारी केले. त्यामुळे नागरिकांना भरे येथे जावे लागणार नाही. तातडीने कार्यवाही केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले.