पुणे – जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी गट-गण रचनेचे प्रारुप आराखडे तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे दहा दिवसांपूर्वी सादर करण्यात आले. आयोगाने या आराखड्याची प्राथमिक तपासणी, नकाशे, हद्दी यांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. आता गट-गण रचनेवर नागरिकांच्या हरकती-सूचना मागविण्यासाठी 15 दिवसांत प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे.
नवीन नियमानुसार पुणे जिल्हा परिषदेमधील सदस्यांची संख्या 7 ने वाढणार असून 82 तर पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या 14 ने वाढणार असून 164 इतकी होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या वाढणार असल्याने अनेक इच्छुकांचे लक्ष या आराखड्यावर आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. पालिका निवडणुकीसाठी वॉर्ड रचना प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी सुरू होत आहे.
मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी अजूनही आयोगाकडे गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला नाही. याविषयी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गट-गण रचना तपासणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडून यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.’