नारायणगाव -मागील आठ दिवसांपासून थंड वारे, ढगाळ वातावरण यामुळे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील द्राक्षबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ढगाळ वातावरणामुळे भुरी, द्राक्षबूज आणि मणीगळ होण्याची शक्यता असल्याने उत्पादन गटण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान वेगाने बदलत आहे. बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षपिकाला बसण्याची शक्यता आहे.
फुलोरा अवस्थेमध्ये असलेल्या बागांमध्ये द्राक्षकूज, मणीगळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय वातावरण निवळल्यानंतर द्राक्षबागेमध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने बागायतदार धास्तावले आहेत. आधीच यावर्षी द्राक्ष उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यातच बदलत्या हवामानाचा आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या परिपक्व झालेल्या द्राक्षबागांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम होऊ शकतो. यावर्षी अति पावसामुळे आणि बागेत पाणी साचल्याने द्राक्षाचे घड जिरल्याची समस्या दिसून आली. या संकटातून शेतकरी सावरतोय तोपर्यंत ढगाळ हवामानामुळे संकटात आणखी वाढ झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षकूज, मणीगळ ही समस्या दिसणार आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अतिपावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनात 35 ते 40 टक्क्यांनी घट झाली होती. तर मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्याने निर्यातक्षम द्राक्षांची अवघ्या 15 ते 20 रुपये किलोने विक्री करावी लागली होती. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून जीवाप्रमाणे जगवलेल्या बागांतून उत्पादन खर्चही निघाला नव्हता. तरी न खचता तो उभा राहिला व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला होता.
यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने दमदार उत्पादन हाथी येण्याची उत्पादकांना आशा होती. तर यंदा ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे गेल्या वर्षीसारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता पुन्हा वातावरणात बदल झाल्याने द्राक्ष उत्पादकांपुढे संकट ओढावले आहे. त्यामुळे आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे व वर्षाचा आर्थिक गाडा कसा हाकायचा, या विंवचनेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
उसावरही तांबेराचा प्रादुर्भाव
अतिवृष्टीपाठोपाठ आलेल्या ढगाळ वातावरणामुळे ऊस पिकावर तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आधीच अतिवृष्टीने ऊस एकशेवडी आणि विरळ आहेत. अशातच तांबेराचे आक्रमण झाल्याने मोठ्याप्रमाणात ऊसउत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. हा रोग धोकादायक असून सामूहिक बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्यक असल्याचे मत ऊस तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.