वाल्ह्यात आपचे साखळी उपोषण सुरू
वाल्हे – पुरंदर तालुक्यांसह राज्यात अनेक तालुक्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने, तीव्र दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली असून सरकाचे शेतकरीवर्गाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात आप (आम आदमी पार्टी)च्या वतीने बेमुदत साखळी उपोषणास मंगळवार (दि. 30) सुरूवात करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीत पुरंदर तालुक्याचा गंभीर स्वरुपाच्या दुष्काळ यादीत समावेश केला आहे. मात्र, शासनाकडून तीन महिने आधी यासंदर्भात जीआर काढूनही दुष्काळी परिस्थितीत अद्यापपर्यंत कसलीच उपाययोजना करण्यात आली नसून सरकारने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तालुक्यातील अनेक गावांत जनावरांचा चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्यांना पशुधन सांभाळणे जिकरीचे झाले आहे.
सरकारने दुष्काळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष देत, त्वरीत चारा डेपो सुरू करावेत; तसेच पीक कर्जावरील व्याज माफ करावे; विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करून त्यांना एसटी पास मोफत देण्यात यावे; शेती पंपाचे पूर्ण लाइट बिल माफ करावे व दुष्काळ संदर्भात जीआर निघाल्या नंतर 21 दिवसापर्यंत तो लागू व्हावा असा कायदा सरकारने करावा.
या मागण्यासाठी आपने वाल्हे गावात महात्मा गांधी पुण्यतिथी दिनापासून बेमुदत साखळी उपोषण शेतकर्यांसोबत सुरू केले असल्याचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय कड यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील विविध गावातील शेतकरी नागरिकांनी आपला पाठिंबा देण्यासाठी उपोषण ठिकाणी भेट दिली. दुष्काळी उपायोजना प्रभावीपणे सरकार सुरू करत नाही, तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील, असे आपचे राजन पवार यांनी सांगितले.