दौंड : दौंडच्या बाजार समितीने पाठीमागच्या काळात शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्गाला वाऱ्यावर सोडण्याचे काम केले असून आताचे संचालक मंडळ शेतकरी व व्यापारी वर्गाचे हित जोपसण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले आहे.
चौफुला (ता. दौंड) येथे दौंड बाजार समितीची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व शेतकरी मेळावा पार पडला, त्यावेळी आमदार कुल बोलत होते. यावेळी भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, नीलकंठ शितोळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, तानाजी दिवेकर, एम. डी. फरगडे, गोरख दिवेकर व संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित होते.
आमदार कुल म्हणाले की, दौंड बाजार समितीने कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून व्यापार वाढवावा.
आपली बाजार समिती पुण्यात जिल्ह्यात अव्वल होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून गरज पडल्यास केंद्रातून व राज्यातून निधी आणला जाईल. राजकारण विरहित कामकाज करून संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी संचालक मंडळास हातभार लावणे गरजेचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून शेतकरी व व्यपाऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असे त्यांनी नमूद केले. साहेबराव वाबळे म्हणाले की, गेल्या 19 वर्षांत पहिल्यांदाच संचालक मंडळाने अशी सार्वजानिक सर्वसाधारण वार्षिक सभा घेतली आहे. कांद्याला चांगला बाजारभाव देण्यासाठी बाजार समितीने पुढील काळात प्रयत्न करावेत.
अशोक हंडाळ म्हणाले की , पहिल्यांदा सर्वसामान्य शेतकरी वर्गासमोर सभा घेतल्याने संचालक मंडळाचे अभिनंदन ठराव त्यांनी मांडला आहे. दौंडच्या इतिहासात प्रथमच आमदार राहुल कुल यांच्या हस्ते व्यापऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पाटस ग्रामपंचायत ने उपबाजारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने यावेळी ग्रामपंचायतचा सत्कार करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन संचालक अशोक फरगडे यांनी केले, प्रास्ताविक गणेश जगदाळे यांनी तर संचालक अतुल ताकवणे यांनी आभार मानले आहे.