शेतीबाबत महाराष्ट्रास मोठा पल्ला गाठावयाचा आहे
मुंबई, दि. 3 – महाराष्ट्राचे राज्यपाल सादिक अली म्हणाले, देशाचे राहणीमान सुधारावयाचे असेल तर शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पन्न वाढविले पाहिजे. अधिक धान्योत्पादन करून व शेतीवर आधारित उद्योगांकरिता कच्च्या मालाचे उत्पादन करून राहणीमान उंचावणे शक्य होईल. महाराष्ट्राने या बाबतीत लक्षणीय प्रयत्न केले असले, तरी अजून बराच मोठा पल्ला गाठावयाचा आहे.
एकूण पिकांपैकी 10 टक्के इतके क्षेत्र महाराष्ट्रात पाण्याखाली येते. ही स्थिती फारशी समाधानकारक नाही. “खेडे निव्वळ श्रीमंत असू नये तर ते सुंदर, निरोगी, सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या पुढारलेले हवे’, हे गांधीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करू या.
भारत-पाकिस्तान दूरसंदेशवहन करार
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान दूरसंदेशवहन करारावर परवा इस्लामाबाद येथे सह्या झाल्या. भारत सरकारच्या वतीने भारताचे पाकिस्तानमधील राजदूत के. एस. वाजपेयी आणि पाकिस्तानच्या वतीने तेथील टेलिफोन आणि टेलिग्राफ विभागाचे सरसंचालक एस. ए. सिद्दीकी यांनी या करारावर सह्या केल्या.
मीठ निर्यातीवर बंदी
नवी दिल्ली – केंद्र सरकारने मीठ निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी 29 सप्टेंबरपासून अंमलात आली. या बंदीस सर्व प्रकारच्या मिठाचा समावेश आहे. देशांतर्गत मिठाची कमतरता भासू नये यासाठी ही बंदी घातली आहे.