जय मल्हार क्रांती संघटना यांच्यावतीने शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन
शिरूर (प्रतिनिधी) – रामोशी बेरड जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाने शिफारस करावी, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी जय मल्हार क्रांती संघटना यांच्या वतीने शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर येथे हे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेच्या पूजाताई शितोळे, छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे, संघटनेचे तालुका युवक अध्यक्ष दिनेश चव्हाण, खजिनदार विजय शितोळे, संघटक आबा शितोळे, अन्याय अत्याचार समितीचे शिरूर अध्यक्ष दत्ता भंडलकर, भारतीय जनता पार्टीचे झोपडपट्टी सेलचे तालुकाध्यक्ष सतीश घोलप, मारुती भंडलकर, मातंग एकताचे अध्यक्ष शहाजी जाधव, मच्छिंद्र बोडरे, दत्तात्रय बोराडे, सुनील खोमणे, कैलास शितोळे, रामा शितोळे यांसह पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
मागील सरकारच्या काळात रामोशी-बेरड समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्या; परंतु सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने या समाजासाठी काहीही केले नाही. या सरकारने रामोशी बेरड समाजाची अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी व इतर सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा यापुढील काळात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-दिनेश चव्हाण, युवक अध्यक्ष शिरूर तालुका
भाजपाने मान्य केलेल्या मागण्या आघाडी सरकारनेही मान्य कराव्यात. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, रामोशी बेरड समाजाचा विकास आराखडा तयार करा. आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच राज्यातील महा विकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी हे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे.
-पूजाताई शितोळे, महिला आघाडी प्रमुख जय मल्हार क्रांती संघटना.