महिला सन्मानासाठी “नागरिक हित’चे मूक आंदोलन : राष्ट्रवादीही आक्रमक
दौंड (प्रतिनिधी) – नागरिक हित संरक्षण मंडळ, आरपीआय- रासप आघाडीच्या नगराध्यक्षा शितल कटारिया यांना नगरपालिकेतील राष्ट्रवादी- शिवसेना युतीचे गटनेते बादशहा शेख यांनी दमदाटी करून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ नागरिक हित मंडळाने “नारी के सम्मान में नागरिक हित मैदान में’ म्हणत नगरपालिका आवारात मूक धरणे आंदोलन केले. तर त्यांच्यासमोरील जागेतच 50 वर्षांपासून शहराला लागलेले ग्रहण हटविण्यासाठी राष्ट्रवादी- शिवसेना मैदानातञ्च अशी आरोळी ठोकून युतीच्या वतीनेही धरणे आंदोलन केले. दोन्ही गटाच्या एकाच वेळेस आंदोलनामुळे नगरपालिकेस पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दोन्ही गटाच्या आंदोलनाचा पवित्रा पाहता आगामी नगरपालिका निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजल्याचे संकेत मिळाले.
दरम्यान, आंदोलनानंतर नगराध्यक्षा कटारिया व शेख यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत आरोप- प्रत्यारोप केले.
आंदोलनाबाबत बोलताना कटारिया म्हणाल्या की, गटनेते बादशहा शेख यांच्या प्रभागातील नागरिकांच्या विनंतीने समस्यांची पाहणी करण्याकरिता मुख्याधिकारी यांना सोबत घेऊन निघाले. शेख यांनी दमदाटी व अवमानकारक भाषा करीत त्यांच्या प्रभागात जाण्यास मज्जाव केला. मी कोणत्याही प्रभागात जाऊन कामाची पाहणी करू शकते, त्यासाठी त्या नगरसेवकाची परवानगी घेऊनच जावे असा काही नियम नाही. शेख यांना 35 वर्षे नगरपालिका कामकाजाच्या नियमांची कोणतीच माहिती नसल्याने त्यांनी आम्हाला रोखले.
शेख हे प्रत्येक नगरसेवक, अधिकाऱ्यांना दमदाटी करतात. ते महिलांचा अवमान करतात. खासदार सुप्रिया सुळे यांचा जर कोणी असा अपमान केला असता तर तो त्यांनी सहन केला असता का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आमदार राहुल कुल यांनी शहरासाठी आणलेल्या निधीतून शहराचा विकास होऊ नये, या उद्देशाने शेख प्रत्येक कामात अडथळा आणत आहेत, शेख यांनी वेळोवेळी सुचविलेली कामे मंजुरीसाठी घेत आलो तरी सुद्धा त्यांची दादागिरी सुरुच आहे. शेख यांचे नगरसेवक पद रद्द व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
कटारियांच्या आरोपांबाबत शेख म्हणाले की, शहरातील घनकचरा व्यवस्थापन व संकलनाचा बोजवारा उडाल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कटारिया यांचा राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांनी राजीनामा मागितला आहे. हा राग मनात धरून त्यांनी हे आंदोलन केले आहे. मी दादागिरी करीत नाही तर कटारिया व त्यांचे कुटुंबीय काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कामकाजात अडथळा आणतात. शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडविण्याच्या वृत्तीच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन केले आहे. मी स्वतः नगराध्यक्षांचा सन्मान राखला आहे. पुण्यातील बैठकीस नगराध्यक्षांना निमंत्रण नसताना त्यांना घेऊन गेलो आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून झालेल्या कामाचे उद्घाटन नगराध्यक्षांच्या हस्ते केले आहे. त्यांचा आरोप खोटा ठरतो. माझ्या प्रभागातील सुरू होणाऱ्या कामाचे श्रेय नगराध्यक्षा घेत आहेत.