निखील जगताप
बेलसर – पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद गट-गणांचा प्रारुप आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला आहे, त्यामुळे आता राजकीय नेतेमंडळी आणि इच्छूक तयारीला लागले आहे. अद्याप, अंतिम आराखडा आणि आरक्षण जाहीर होण्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मिनी विधानसभेच्या या आखाड्यात ज्येष्ठ नेत्यांनी आपले वारसदार राजकीय क्षेत्रात उतरविण्यास सुरुवात केली आहे. बदललेल्या रचनेनुसार सर्वच पक्षीय इच्छुकांची संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे. त्यातच नवीन इच्छुक उमेदवार आणि ज्येष्ठ नेत्यांचे राजकीय वारसदार यांच्यामध्ये नक्की कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नुकतीच जिल्हा परिषद व पंचायत समिती गट आणि गण रचना जाहीर झाली असल्याने, पुरंदर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या त्यासोबत नेतेमंडळींच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. झालेल्या बदलांमुळे अनेक नेत्यांना आपले जुने संबंध बदलून नवीन संबंध प्रस्थापित करावे लागणार आहेत; परंतु काही उमेदवारांना झालेला बदल हा फायदेशीर ठरत आहे. नवीन रचनेनुसार पूर्वीच्या चार जिल्हा परिषद गटांची विभागणी होऊन पाच गट तयार करण्यात आले आहेत. तर पूर्वीच्या आठ पंचायत समिती गणांची विभागणी करून दहा पंचायत समिती गण निर्माण झाले आले आहेत. बहुसंख्य गट-गणांमध्ये ज्येष्ठ नेत्यांचे वारसदार निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. काहींची ही निवडणूक पहिली तर काहींना ग्रामपंचायत आणि इतर राजकीय अनुभव असल्याचे पाहावयास मिळत आहे. झालेल्या गट विभाजनामुळे काही नेत्यांना डोकेदुखी झाली आहे. तर या बदलांमुळे सर्वसामान्य मतदार समाधान व्यक्त करीत आहे.
मागील अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नेत्यांनी आपले राजकीय वारसदार राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कार्यकर्त्यांचे वाढदिवस इच्छुक उमेदवार स्वतः हजर राहुन मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतआहेत; दहावा, सामाजिक कार्य, विशेष उपक्रम, लग्न समारंभ, सभा, भेटीगाठी यांना ते
उपस्थित राहून आपले हितसंबंध व समाजामध्ये आपली ओळख निर्माण करीत आहेत.
चर्चा, भेटीगाठींनी धरला जोर
इच्छुक उमेदवारांची बैठका, चर्चा,भेटीगाठी आणि हितसंबंध जोपासणे कडे लक्ष दिले आहे. त्यामध्ये आरक्षणाची सोडत काय होणार आणि ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाची वाट पाहत सद्यस्थितीला इच्छुक उमेदवारांनी आपले हात पसरवण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये सद्यस्थितीला जोरदार चर्चा रंगली आहे. पण निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावरच आणि आरक्षणाचा निर्णय झाल्यावरच पुढील पावले ठळक होतील.
कोलते यांचा राजकारणात प्रवेश निश्चित
पिसर्वे-माळशिरस गटात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांचा मुलगा गौरव कोलते यांचा राजकारणातील प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वारसदार हे रिंगणात उतरणार की नवोदितांना संधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे; परंतु विकासाची भूमिका असेल त्याचे स्वागत आहे. अशी चर्चा मतदार करीत आहेत.
कार्यकर्त्यांच्या मनात “ते’
नीरा-वाल्हे गटावर प्रभुत्व असलेले व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे स्वतः व त्यांची
मुलगी डॉ. प्राजक्ता दुर्गाडे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नाहीत. मात्र, कार्यकर्ते व मतदारांच्या मनात त्यांनीच निवडणूक लढवावी अशी प्रबळ इच्छा आहे.
“त्यां’च्या भूमिकेकडे लक्ष
जुन्या दिवे-गराडे जिल्हा परिषद गटामध्ये माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांचे प्रभुत्व आहे. तर त्यांचा मुलगा बाबाराजे यांची मुलगी उदयानी जाधवराव यांच्या नावाची चर्चा गटामध्ये सध्या जोर धरत आहे. त्यामुळे बाबाराजे यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
जनसंर्क वाढवण्यात मग्न
मांडकी-परिंचे गटामध्ये माजी आमदार व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची मुलगी डॉ. ममता शिवतारे यांनी आपल्या गटामध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.
इच्छुक वारसदार
जवळार्जुन-बेलसर गटामध्ये पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचा मुलगा अजिंक्य टेकवडे राजकारणात सक्रिय आहे. प्रामुख्याने जवळार्जुन गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष म्हणून ते काम करतात. अजिंक्य हे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेचे आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांचा मुलगा रणजीत तर मुलगी सारिका इंगळे हे ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत व ते स्वत:ही इच्छुक आहेत.