जेजुरीतील अन्यायग्रस्तांचे राष्ट्रपतींना निवेदन
जेजुरी – पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 या महामार्गाचे रुंदीकरण होत आहे. बाह्यवळण रद्द करून जेजुरी शहरातून पुणे पंढरपूर महामार्गांवर रस्त्याच्या केवळ उत्तर बाजूकडील जागा भूसंपादन केली जात आहे. या पूर्वीही दोनवेळा उत्तरेकडीलच बाजूचे जाणूनबुजून रुंदीकरण केले आहे. त्यामुळे अनेक रहिवाशांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होवून कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. यातील अनेक कुटुंबांनी हताश होवून राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे इच्छा मरणासाठी परवानगी मागितली आहे.
यापूर्वीही म्हणजेच 2015मध्ये प्रशासनाने धाकधपटशा दाखवत उत्तर दिशेकडील लोकांची दुकाने घरे पाडली होती. तर सध्याच्या काळात पुणे ते पंढरपूर महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 साठी सर्व्हेक्षण होवून भूसंपादनासाठी प्रक्रिया सुरू आहे. यात अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याच्या मध्यातून समसमान अंतरावर खुणा न करता केवळ रस्त्याच्या उत्तरेकडील जागा भूसंपादन केली जात आहे. 2000 आणि 2015मध्येही रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुणा करून केवळ उत्तरेकडील दुकाने व घरे पाडण्यात आली होती.
या संदर्भात संबधित प्रशासकीय कार्यालयात हरकती नोंदवून ही बाब शासनच्या निदर्शनास आणून देवूनही शासकीय अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देवून एकतर्फी भूसंपादनाची प्रक्रिया राबवीत आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होवून कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, अशी माहिती अन्याग्रस्त नागरिकांनी दिली. उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट होत असल्याने जगयाचे कसे हा प्रश्न निर्माण झाला असून आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी आयुब महमंद पानसरे, रामभाऊ शंकर काकडे, विमल म्हाळसाकांत खोमणे, गणेश गोविंद खोमणे आदींनी निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे.
हा जेजुरीकरांवर अन्याय
जेजुरी हे यात्रेचे ठिकाण असताना जेजुरी शहरातून राष्ट्रीय महामार्ग विकसित केला जात आहे. जेजुरी शेजारील सासवड व नीरा येथून बाह्यवळण विकसित केले जात आहे. हा जेजुरीकारांवर अन्याय आहे. केवळ राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी बाह्यवळण रद्द करण्यात आले आहे.