मृत्यूनंतर आपलं शरीर संपून जातं; पण ते शरीर चालवणारं आतलं चैतन्य कुठे जातं? त्या चैतन्याला म्हणायचं काय? जन्म घेताना शरीरात ते येतं कुठून? मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या देहाचं काय होतं, हे भौतिकशास्त्र आपल्याला सांगू शकेल; पण शरीर सोडून चैतन्य कुठे जातं, हे कुणीच सांगू शकलेलं नाही. शेकडो-हजारो वर्षांपासून माणसानं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय.
कुणी त्या चैतन्याला “आत्मा’ म्हणतो तर कुणी तो दिसत नाही म्हणून त्याचं अस्तित्व नाकारतो. आत्म्याचं अस्तित्व मान्य करणारा स्वर्ग आणि नरकाची संकल्पना मान्य करतो. त्यालाच जोडून पाप-पुण्य या संज्ञा येतात. पुण्य करणाऱ्याचा आत्मा स्वर्गात जातो आणि पाप करणाऱ्याच्या आत्म्याला नरकात जावं लागतं, अशी मांडणी स्थूलमानानं केली जाते. हा जो कोणी “आत्मा’ किंवा “आतला आवाज’ आहे, त्यालाच कुणी मन म्हणतो तर कुणी विवेक किंवा जमीर म्हणतो. त्याला जे पटेल त्याच गोष्टी शरीराकडून घडतात असं मात्र नाही. भोग-उपभोग शरीर घेतं; पण संतुष्टी-वेदना आत कुठेतरी जाणवते. तरीही “आतला आवाज’ न ऐकता देहाच्या संतुष्टीसाठीच आपण झगडतो. मनुष्य आस्तिक असो वा नास्तिक, चूक-बरोबर त्याला समजतं. मृत्यूनंतर “वर’ हिशोब होतो का? माहीत नाही; पण एखादा मृतदेह पाहिला, की आतल्या-आत आपण आपल्या चांगल्या-वाईटाचा हिशोब करू लागतो.
असं असेल तर माणसाच्या मृतदेहासमोर तरी आपण माणसासारखं वागायला हवं, होय ना? पण बिहारमध्ये परवा-परवा घडलेली घटना थोड्याफार फरकानं बऱ्याच ठिकाणी घडताना दिसते. एक गरीब आईबाप 25 मेपासून आपल्या 25 वर्षांच्या मुलाला शोधत असतात. मुलगा मनोरुग्ण. 7 जून रोजी म्हणजे 13 दिवसांनी जवळच्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची बातमी येते. आईवडील पोलीस ठाण्याकडे धाव घेतात. तिथे गेल्यावर समजतं, मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवलाय. आईवडील धावत रुग्णालय गाठतात. शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यासमोर हात जोडून उभे राहतात आणि म्हणतात, “”ओळख पटवायची आहे.
मृतदेह दाखवा.” कर्मचारी प्रथम नकार देतो. बऱ्याच वेळा हातापाया पडल्यावर केवळ चेहरा दाखवायला तयार होतो. आईवडील मुलाला ओळखतात. मृतदेह ताब्यात मागतात; पण कर्मचारी नकार देतो. “”बॉडी दाखवली हेच खूप झालं; आता 50 हजार घेऊन या आणि बॉडी घेऊन जा,” असं सांगतो. आईवडील पैशांची जुळणी करण्यासाठी गावात येतात. खांद्यावरच्या गमछाची झोळी करून वडील गावातून फेरी मारतात. मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी भीक मागतात. लोक मदत करतात. दरम्यान, कुणीतरी त्यांचा व्हिडिओ तयार करतं. थोड्याच वेळात तो मीडियाच्या हाती लागतो.
सिव्हिल सर्जनना विचारणा होताच ते चौकशीचे आदेशदेतात आणि संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईचं आश्वासन देतात. आठवून पाहा, अशा अनेक घटना आजूबाजूला घडत असतात. फक्त तपशिलात फरक असतो. अशा घटनेवेळी त्या निर्जीव शरीरांमधलं चैतन्य नक्कीच आसपास घोटाळत असेल. ज्या शरीरात आपण वर्षानुवर्षे राहिलो, त्याची फरफट पाहत असेल. या जागी उद्या आपला मृतदेह असेल. या जाणिवा मृतदेहासमोर होणार नसतील, तर शरीरात चैतन्य असून नसल्यासारखंच की..!
हिमांशू