गावगाड्यासाठी आज मतदान जनतेशी प्रामाणिक राहणेच गरजेचे
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. 5) मतदान पार पडत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत गेले आठ दिवस श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल व श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनल कडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या.
निवडणुका म्हटल्या की, आरोप प्रत्यारोप होणे स्वाभाविक आहे; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मभूमी आणि राष्ट्रपती पदक विजेत्या लावणीसम्राज्ञ स्व. विठाबाई भाऊ मांग यांच्या नावाने ओळख असलेल्या नारायणगाव शहराचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून राजकारण विरहित एकपणाच्या संस्कृतीला तडा जाऊ नये, अशी जनसामान्यांची भावना आहे. निवडणुका
संपल्यानंतर वाद विवाद संपुष्टात आले पाहिजे.
नारायणगावच्या विकासासाठी एखाद्या सदस्याने चुकीची कामे केली असतील तर सत्तेच्या खुर्चीसाठी प्रचाराचा मुद्दा न बनवता वेळीच पायबंद घालून निदर्शनास आणून दिले पाहिजे. अन्यथा आपण दोघे भाऊ भाऊ, दोघे मिळून खाऊ असे होता कामा नये. चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणे म्हणजेच मतदारांच्या विश्वासाला तडा जाणे होय. जनतेशी प्रामाणिक राहणे सत्ताधाऱ्यांची भूमिका असायला पाहिजे.
एकूण मतदार
नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 16 हजार 849 मतदार आहेत. यात महिला 3385 तर पुरुष 8464 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तसेच दोन्ही पॅनलकडून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा प्रयत्न असेल.
विजयाने हुरळून जाऊ नका
निवडणुका म्हटलं की जय पराजय नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयोत्सोव साजरा करताना हूरळून जाऊ नका. कारण पुढील पाच वर्ष सर्वांना एकमेकांच्या हातात घालून गावाच्या विकासाचीकामे करायची आहे.
वचनांची पूर्तता करा
निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणे निवडून आलेल्या सदस्याचे काम आहे. एखाद्या वॉर्डात आपल्या पॅनलचा उमेदवार निवडून आला नाही म्हणजे त्या वॉर्डाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मनाचा कोतेपणा दाखवता येणार नाही.