Ajit Pawar in Baramati : शिंदे फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सत्तेत सामील झाल्यानंतर आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाला. पक्ष फुटी नंतर दीर्घकाळ अजित पवार बारामतीत आले नव्हते.
ते बारामतीत कधी येणार याकडे तमाम बारामतीकरांचे लक्ष लागून होते. तेव्हा तब्बल दोन महिन्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊनच ते बारामतीत आले होते यावेळी बारामतीकारांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले होते. मात्र तेव्हापासून त्यांचा जनता दरबार बंद होता. मात्र आज सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच जनता दरबार भरला आहे.
नेहमीप्रमाणे बारामतीकरांनी आजच्या जनता दरबारात मोठी गर्दी केल्याचे पाहिला मिळत आहे. आपली कामे, समस्या, अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची कामे उपमुख्यमंत्री अजित पवार जागच्या जागी मार्गी लावत असतात. यासाठी कोणत्याही सामान्य नागरिकाला कोणत्याही मध्यस्ताची गरज भासत नाही. म्हणूनच बारामतीकर नागरिक आपली कामे घेऊन या जनता दरबारात येत असतात.
सत्ता असो वा नसो उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच बारामतीत जनता दरबार घेत असतात. या जनता दरबारात नागरिकांची कामे जागच्या जागी मार्गी लावण्याचा पवार यांचा प्रयत्न असतो. या जनता दरबारावेळी विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित असतात. नागरिकांचे ज्या विभागाशी कामे आहेत. त्या त्या विभागाला सूचना करत नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावतात. विशेष बाब म्हणजे बारामतीकरांना आपली कामे घेऊन पुणे, मुंबई या सारख्या ठिकाणी यावे लागू नये म्हणून बारामतीत नियमित जनता दरबार घेत असतात.