सत्यशील शेरकर : पिंपळगाव जोगात विघ्नरकडून शेतकरी मेळावा
ओझर – कांदा, भाजीपाला, फुले आदी तरकारी पिकांना शाश्वत बाजारभाव मिळत नाही. भविष्यात उसाला प्रतिटन 3 रुपयांपेक्षा कमी बाजारभाव मिळणार नाही, त्यामुळे सर्वांनी ऊस लागवडीकडे वळावे, असे आवाहन विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी केले.
विघ्नहर कारखान्याच्या वतीने गुरुवारी (दि. 29) पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेरकर बोलत होते.
यावेळी कृषिरत्न, कृषिभूषण डॉ. संजिव माने, विघ्नहरचे उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे, शेतकी अधिकारी सचिन पाटील, जुन्नर बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर (माऊली) खंडागळे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, पुणे जिल्हा बँकेचे संचालक तुळशिराम भोईर, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, गुलाब पारखे, तुषार थोरात, अनंत चौगुले, प्रगतशिल शेतकरी पंकज वामन, बाजीराव मानकर,
एकनाथ डोंगरे, जयवंत डोके, मंगेश काकडे, नंदाताई बनकर, सुरेखा वेठेकर, सुरेखा मुंढे, लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, जितेंद्र बिडवई आदींसह विघ्नहरचे आजी-माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गांवचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्यास संसदरत्न, शिरुर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट दिली.
सत्यशील शेरकर म्हणाले की, ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत ताग, धैंचा बियाणे, ऊस बेणे, ऊस रोपे, जिवाणू खते व व्हीएसआय उत्पादनांचा पुरवठा केला जातो. भविष्यकाळात कारखान्याची गाळप क्षमता 7500 टन प्रतिदिनी करणार असून 180 दिवसांऐवजी 120 दिवसात गाळप पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. भविष्यात पाणीप्रश्न गहण होणार असून त्यासाठी आंदोलन करावे लागेल. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यास विघ्नहरचे संचालक मंडळ कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊस उत्पादन वाढीसाठी सेंद्रीय व जैविक खतांचा जास्तीत जास्त प्रमाणावर वापर करावा, शेणखताचा मोठ्याप्रमाणात वापर करावा. नसेल तर हिरवळीच्या खतांचा वापर करावा, तसेच शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांचा वापर, प्रतिएकरी 40 ते 45 हजार ऊस राखल्यास त्याचबरोबर पाणी व किडरोग व्यवस्थापन केल्यास प्रति एकरी भरघोस ऊस उत्पादन मिळेल.
– डॉ. संजिव माने, कृषिरत्न, कृषिभूषण