मनोज खंडाळे
यवत – दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामीण रुग्णालयातील रक्त तपासणी विभाग हा वेळेपूर्वीच बंद होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमधूद ग्रामीण रुग्णालयाबत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर यवत येथे असलेले ग्रामीण रुग्णालय हे यवत आणि पंचक्रोशीमधील गरजू रुग्णांना मोठा आधार आहे. मात्र, रुग्णालयाच्या कारभाराबाबत तसेच सुविधा या सध्या रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळा निश्चित नसल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यवत पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेसाठी असलेले यवत रुग्णालय हे सकाळी वेळेत सुरू होत नसल्याची चर्चा सध्या सर्व परिसरात सुरू आहे. परंतु बंद होण्याच्या वेळेपूर्वीच अनेक सेवा बंद केल्या जात असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे.
रुग्णालयाचे अधीक्षक हे कर्तव्यदक्ष असून रुग्णालयातील कर्मचारी वर्ग त्यांना म्हणावे असे सहकार्य करीत नसल्याची चर्चा आहे. रुग्णालयात चार महिन्यांपासून रंगरंगोटीचे काम चालू असून यावेळी सुविधा, नियम, आदींचे काढण्यात आलेले फलक अजून देखील लावलेले नसल्याने अनेक रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची रांग असताना देखील वेळेच्या आधी याठिकाणी रक्त तपासणीसाठी असणारी प्रयोगशाळा देखील वेळेच्या आधीच बंद करून कर्मचारी कुलूप लावून निघून जात असल्याचा आरोप यावेळी रुग्णांनी केला. रुग्णांना मात्र बाहेरून रक्त तपासणीसाठी खिशाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. मात्र, यावर कोणी पुढे येऊन बोलायला तयार होत नाहीत. रुग्णालयात रुग्णांना सेवा देण्याच्या नावाखाली कर्मचारी मात्र रुग्णांना उद्धट बोलून त्यांची बोलती बंद केल्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत.
चौकशी करणार- डॉ. बाळासाहेब कदम
याबाबत ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 च्या डॉ. बाळासाहेब कदम यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले की, रुग्णालयात जोपर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे. तोपर्यंत रक्ततपासणी करणारी प्रयोगशाळा देखील चालू ठेवावी लागत असते. जर बाह्यरुग्ण विभागात रुग्ण असतील. प्रयोगशाळा बंद करण्यात आली असल्यास आणि नागरिकांची गैरसोय होत असल्यास त्याची चौकशी करू, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
रक्ततपासणी मशीन बंद
ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी ही मशीनद्वारे केली जाते. हे मशीन मागील चार दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळत आहे. ही मशीन कधी दुरुस्त होईल, याची माहिती विचारली असता कोणालाही याची माहिती देता येत नाही. यामुळे मॅन्युअली रक्ताची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती कर्मचारीवर्गातून दिली जात आहे.
स्वच्छतागृहात स्वच्छतेला तिलांजली
ग्रामीण रुग्णालयामध्ये महिला आणि पुरुष, असे दोन विभाग असून त्या विभागांमध्ये असणारे स्वच्छतागृहात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतागृहात पाण्याचा सुद्धा काही दिवस तुटवडा असल्याचे रुग्ण सांगत आहेत. दोन ते तीन दिवस स्वच्छतागृह साफ केल्याने दुर्गंधी पसरल्याने रुग्णांना उपचार घेत सामोरे जावे लागत असल्याची तक्रार महिला आणि पुरुषांच्या रुग्ण विभागातून केली आहे.