चासकमान 75 टक्के : भीमा, भामा, इंद्रायणी आणि आरळा नद्या दुथडी
राजगुरूनगर – पुण्याला पाणी पुरवठा करणारे भामा आसखेड धरण 69.51 टक्के भरले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पी. ए. आंधळे, विभागीय अधिकारी शाखा अधिकारी निलेश घारे, वसंत ढोकरे यांनी दिली.
खेड तालुक्यात सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील भीमा, भामा, इंद्रायणी आणि आरळा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. भीमाशंकर परिसरात आज सुमारे 130 मिलिमीटर पाऊस पडला तर कळमोडी धरण 92 मिलीमीटर, चास कमान 58 मिलीमीटर व भामा आसखेड धरण परिसरात 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
खेड तालुक्यातील कळमोडी धरण चार दिवसांपूर्वी 100 टक्के भरले आहे. चास कमान धरण 75 टक्के तर भामा आसखेड धरण 70 टक्के भरले आहे. भीमा भामा आणि आरळा नद्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. या नद्यांना पूर आल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील बंधारे, पाझर तलाव पूर्ण क्षमेतेने भरले आहेत. कळमोडी धरणाच्या सांडव्यावरून खाली 16,260 क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग होत असून ते चास कमान धरणात जमा होत आहे.
भीमाशंकर परिसरात जोराचा पाऊस पडत आहे. त्यामुळे भीमा व आरळा नद्यांना मोठा पूर आहे. चास कमान धरणात सुमारे 25000 क्यूसेक वेगाने पाणी जमा होत आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत भीमा नदीत विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरणाकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात उतरू नये. पात्रातील शेतीचे साहित्य, जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.
-उत्तम राऊत, शाखा अभियंता चास कमान धरण