ओतूर – येथील परिसरात गेले आठवडाभर संततधार व मुसळधार पावसामुळे शेतातील टोमॅटो पीक, आगाऊ पेरणी केलेल्या सोयाबीन व श्रावण महिन्यातील मागणी असलेल्या मेथी, कोंथिबीर, काकडी या उभ्या पिकात पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ओतूर परिसरातील धोलवड, ठिकेकरवाडी, डुंबरवाडी, हांडेबन, डोमेवाडी, गाढवे पट, उत्तर विभागातील रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, पश्चिम विभागातील उदापूर, डिंगोरे आदी गावांमध्ये हा पाऊस सुरू आहे.
काही ठिकाणी कांदा बराकीत पाणी शिरल्याने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालाय. काही ठिकाणी टोमॅटोच्या शेतात पाणी साठल्याने टोमॅटोची लगडलेली टोमॅटो बुडाली आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची आगाऊ पेरणी केली होती. त्यांचा उतार चांगला झाला होता, वाढीस लागले होते; परंतु मुसळधार पावसामुळे उतरून आलेले सोयाबीन सडू लागले आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार आहे.
श्रावण महिन्यात मेथी, कोथिंबीर, कारले या भाज्यांना खूप मागणी असते. म्हणून काही शेतकऱ्यांनी शेतात या भाज्यांचे पिक घेतले आहे. शेतात पाणी साठल्याने या भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. या वर्षी कांद्याने बाजारभाव नसल्याने रडविले व संततधार पाऊस मुसळधार पावसामुळे हातात तोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून घेतला आहे.
या संततधार पावसामुळे टॉमेटो सोयाबीन भाजीपाला या पिकांचे त्वरीत पंचनामे करावेत, अशी मागणी चैतन्य फार्मर क्लबचे भानुविलास गाढवे, बबनराव भोरे, उदापूरचे राहुल शिंदे, रोहोकडीचे शांताराम हिंगणे, सुदाम घोलप, रामदास घोलप, सचिन घोलप, अमोल घोलप यांनी केली आहे.