पठाणी वसुलीने कर्जदार हैराण : जुजबी तक्रारी दाखल, कारवाई कागदोपत्री
बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर आणि तालुक्यात सावकारकीने उच्छांद मांडला आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरून जमिनी, घरे, स्थावर मालमत्ता बळकावून धनदांडग्यांनी फौजच निर्माण केली आहे. दहशतीच्या बळावर बारामती शहर आणि परिसर दबून गेला आहे. बोकाळलेली सावकारकीला चाप कधी लावणार, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे.
बारामती शहर, तसेच बागायती टापूत सधनता आहे. यातच गरीब आणि गरजू नागरिकांना कुटुंबाच्या खर्चासाठी अन्य कारणासाठी बॅंका कर्ज देत नाही. त्यामुळे कमी वेळेत आणि विनाकटकट रक्कम मिळण्यासाठी गरजू कुटुंबांना सावकारांचे दरवाजे नेहमीच खुले असतात. त्यामुळे हे सावकार सावज हेरून बसत आहेत. यात पांढरे शुभ्र कपडे, गळ्यात सोन्याची चेन आणि महागड्या गॉगलची झगमगाट ही वेशभूषा बारामती शहर आणि तालुक्यात लक्ष वेधून घेत आहे.
नाडलेल्या कुटुंबाकडून पाच ते पंचवीस टक्क्यांपर्यंत व्याज आकारण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे हेरलेले सावज अलगद त्यांच्या जाळ्यात सापडत आहे. रुग्णालयाचा खर्च, शिक्षण, अन्य खर्चासाठी बॅंकांची कागदपत्रे गोळा करण्यापेक्षा सावकारकी बरी म्हणून जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. काही सावकारांनी कोट्यवधींची माया गोळा केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षभरात अनेक कुटुंबे व्याजाच्या बोझ्याखाली दबून गेली आहे. त्यामुळे सावकारांचा तगादा या कुटुंबासाठी जीवावर बेतत आहे.
शहर परिसरातील बाधा ग्रामीण भागात
बारामती शहर परिसरात हा बिनबोभाट धंदा हातपाय पसरत आहे. शहराभोवती असलेल्या जळोची, रुई, तांदूळवाडी, एमआयडीसी परिसर, माळेगाव परिसराला व्यापून टाकले आहे. सोमेश्वरनगर, करंजे पूल, डोर्लेवाडी, घागरवाडी, सांगवी आदी गावांमध्ये हा व्यवसाय पोलीस खात्याच्या दुर्लक्षामुळे चांगलाच फोफावला आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी सावकारांविरोधात कारवाईची मोहीम उघडली होती. काहीजणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर ही मोहीम थंडावल्यानंतर पुन्हा डोके वर काढले आहे. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना झापले होते. मात्र, पुन्हा “जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.
गतवर्षी सावकारकीविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर बारामती शहर व तालुक्यातील सावकारकी थंड झाली होती. सद्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी सावकरांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. तक्रार दाखल झाल्याने सावकारांविरोधात ठोस पावले उचलून त्यांचा बंदोबस्त केला जाईल.
– नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती.