पुणे – केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली आहे. तिचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने अटी घातल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने संबधित शेतकरी हा आयकर भरणारा असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. तरीसुध्दा काही शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज भरून त्यांनी या योजनेचा लाभ घेता. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. केंद्र शासनाने या योजनेतील सर्व शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननी तसेच पॅनकार्ड क्रमांकावरून आयकराची माहिती जमा केली असता, पुणे जिल्ह्यातील 16,110 शेतकरी आयकर भरत असल्याचे लक्षात आले. या सर्व शेतकऱ्यांना एकूण सुमारे 14 कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत निधी संबधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. या योजनेच्या निकषाप्रमाणे आयकर भरणारे व्यक्ती या योजनेस अपात्र आहेत. त्यानुसार केंद्र शासनाने पात्र लाभार्थ्यांपैकी आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिली आहे. आयकर भरत असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम वसुल करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने संबधित तहसिलदार यांच्याकडे ही यादी वर्ग केली आहे.
तहसिलदार यांच्याकडून संबधित शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहे. नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसात रक्कम जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र या माध्यमातून https://www.pmkmy.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केली होती.
तालुकानिहाय अपात्र ठरलेले शेतकरी
बारामती-2394, आंबेगाव-1171, भोर-633, दौंड-1673, हवेली-692, इंदापूर-1037, जुन्नर-2140, खेड-1473, मावळ-538, मुळशी-830, पुरंदर-1332, शिरुर-1925 आणि वेल्हा 272.