खासदार अमोल कोल्हेंना निवेदन
शिक्रापूर – शिरुर तालुक्यातील बारा गावांमध्ये पाणी टंचाईमुळे नेहमी दुष्काळ असताना बारा गावांतील ग्रामस्थांनी आंदोलने करीत रस्ता रोको केला आहे. याबाबत पाणी मिळण्याबाबत आश्वासन देण्यात आलेले असताना आता बारा गाव पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवेदन देत बारा गावांना धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे.
शिरुर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाणी समस्या सोडवण्यासाठी बारा गाव पाणी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पाबळमध्ये रास्तारोको करीत नंतर केंदूरमध्ये शिरुर तालुक्यातील केंदूर, पाबळ, धामारी, मोराची चिंचोली, वरुडे, कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, खैरेवाडी, सोने सांगवी, खैरेनगर, हिवरे, लाखेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी साखळी उपोषण केले.
मात्र, त्यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आंदोलनस्थळी भेट देखील दिली नाही. मात्र, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक होऊन याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, तोडगा निघाला नसताना सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी
शिवनेरीहून जन आक्रोश मोर्चा सुरु केलेला असताना नुकतेच पाबळ येथे बारा गाव पाणी हक्क संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेत निवेदन देऊन या बारा गावांना धरणाचे पाणी देण्यासाठी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील ग्रामस्थांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.