‘भीमा’वरील पुलाचे संरक्षण कठडे गेल्यावर्षीच वाहून गेले : दुरुस्तीला मुहूर्त मिळेना
राजगुरूनगर – भोमाळे खालचे येथील भीमा नदीवरील पुलाचे कठडे मागील वर्षीच्या अतिवृष्टीत वाहून गेले होते ते अद्याप दुरुस्ती न केल्याने त्यावरून नागरिकांना जाणे धोक्याचे झाले आहे. पुलाला तात्काळ संरक्षण कठडे बसविण्यात यावेत, अशी मागणी भोमाळे ग्रामस्थानी केली आहे.
खेड तालुक्यातील खालचे भोमाळे हे मुसळधार पावसाचे गाव आहे. 1992 मध्ये खालचे भोमाळे गावाच्या मागे भू स्कलन झाले होते त्यात सुदैवाने अख्खे गाव थोडक्यात बचावले होते. दरवर्षी भोरगिरी, भीमाशंकर, भोमाळे येथे अतिवृष्टी होते भीमा नदीला आलेल्या पुराचे पाणी या गावात जाणाऱ्या पुलावरून जाते. त्यामुळे पुलाचे कठडे वाहून जातात. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील पुलाचे संरक्षण कठडे वाहून गेले होते. त्याची पाहणी तहसीलदार व अन्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांनी केली होती. या पुलाची दुरुस्ती तात्काळ करण्याचे आदेश दिले होते; मात्र तसे काहीच झाले नाही.
भोमाळे गावात जाण्यासाठी भीमा नदीवरील हा पूल कठडे नसल्याने धोक्याचा बनला आहे या पुलावरून शाळकरी मुले, वयोवृद्ध ग्रामस्थ यांची येजा असते याभागात जोराचा पाऊस आणि त्याच प्रमाणात वारे वाहतात त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना संरक्षक कठड्यांचा मोठा आधार मिळतो; मात्र मागील पावसात ते वाहून गेल्याने शाळकरी मुलांना नागरिकांना पुलावरून जाणे धोक्याचे झाले आहे.
शाळकरी मुलांना पुलावरून आणण्यासाठी पालकांना जावे लागते. या पुलाला तात्कळ संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी सरपंच सुधीर भोमाळे, अंकुश शिंदे, रामदास सावंत, मनोहर शिंदे, चंद्रकांत केदारी, बाळू जाधव यांच्यासह ग्रामस्थानी केली आहे.