दिल्ली येथे “मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमात झाले सहभागी
नारायणगाव – “मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमांतर्गत दिल्ली येथे पार पडणाऱ्या अमृत कलश संकलन व समारोप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथील 12 स्वयंसेवक रवाना झाले आहेत.
आकाश भारद्वाज, ऐश्वर्या ढवळे, अनिकेत थोरात, कोमल बोऱ्हाडे, साहिल वालकोळी, वेदिका बनकर, गोरक्ष कानवडे, कुणाल पोखरकर, धनश्री नाईकरे, प्रवेशिका पोखरकर, गायत्री पोखरकर, अभय कसबे रवाना झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी दिली. जागतिक विश्वविक्रम निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभरातून शासनाच्या “मेरी माटी, मेरा देश’ माध्यमातून विविध महाविद्यालयांच्या अमृत कलशातील मातीचे कर्तव्यपद दिल्ली येथे संकलित करून अमृतवाटिका तयार केली जाणार आहे.
यामध्ये विविध रोपाची लागवड केली जाणार असून नारायणगाव महाविद्यालयातील “रासेयो’चे स्वयंसेवक मागील पंधरा दिवसांत 18 हजारपेक्षा जास्त सेल्फी फोटो संकलित करण्यात अग्रेसर ठरले आहेत. पुणे जिल्ह्यासाठी नारायणगाव महाविद्यालयात मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा राबविण्यात आली होती.
कार्यशाळेमध्ये 800 स्वयंसेवकांना महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार सदस्य राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी उपक्रमाचे मार्गदर्शन केले.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महाविद्यालयांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. सहभागाबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर व सर्व संचालकांनी अभिनंदन केले.