पुणे, ता. २६ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यातील न्यायालयीन कामकाजाची वेळ कमी करण्यात आली आहे. त्यानुसार येथील ग्राहक आयोगात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनावणी घेतली जात आहे. तर या महिन्यात सुनावणी असलेल्या तक्रारींना थेट जून किंवा त्यानंतरच्या महिन्यातील तारखा देण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार राज्य ग्राहक आयोगातील प्रत्यक्ष सुनावणी सप्टेंबर महिन्यात बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२० महिन्यातील दाव्यांच्या सुनावणीला डिसेंबरपासून २०२० पासून मार्च २०२१ मधील तारखा देण्यात आल्या होत्या.
अशीच स्थिती आता जिल्हा आयोगातील तक्रारींच्या बाबतीत झाली आहे. त्यामुळे तक्रारदारांना न्याय मिळण्यात उशीर होत आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सध्या न्यायालयांचे कामकाज ऑनलाइन सुरू ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र त्यातील तांत्रिक अडचणींमुळे सुनावणीवर परिमाण होत आहे. त्यामुळे प्रलंबित दाव्यांची संख्या आणखी वाढली आहे.
आयोगात प्रॅक्टिस करणारे कन्झ्युमर ऍडव्होकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष ज्ञानराज संत यांनी याबाबत सांगितले की, न्यायालयीन कामकाज सुरू ठेवण्याबाबत जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार सध्या आयोगाचे कामकाज सुरू आहे. प्रत्यक्ष सुनावणीमुळे कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी तक्रारींच्या सुनावणीला जून व त्यानंतरच्या तारखा देण्यात आल्या आहेत. राज्य आयोगात महत्त्वाचे दावे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाखल करून घेतले जात आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणी पुन्हा सुरू होर्इल.